
Pune News : आलमट्टी धरणात पाणी अडवल्यास काय होते याचा नजारा दोन वेळा अख्खा देशाने पाहिला आहे. 2016 आणि 2019 ला सांगलीसह कोल्हापूर शहर पाण्याखाली होतं. यानंतर आता आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील नागरीकांचा जीव टांगणीला लागला आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतीला पूराचा फटका बसणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरींकांनी आलमट्टीच्या उंचीला विरोध करताना राज्य सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी केली होती. पण आता मागणी ज्या सरकारकडे केली तेच धृतराष्ट्र सारखी भूमिका घेत असल्याचे उघड झाले आहे. उंची वाढविण्याचा विरोध कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच राज्याने केला नसल्याचे उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने दिले आहेत. यामुळे राज्यसरकारच्या भूमिकेवरच आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
खासदार विशाल पाटील यांनी आलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये, यासाठी फेरविचार केला जावा, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केली होती. याच प्रश्नाचे उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या सहीने देण्यात आले आहे. ज्यात आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जल लवादाने मान्यता दिली आहे. मात्र कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच राज्याने याला विरोध केला नाही. त्यामुळे कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नाही, असे स्पष्टीकरणच आता या उत्तरात खासदार पाटील यांना केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने दिले आहे.
यावरून खासदार पाटील यांनी सांगितले की, आलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये, याबाबत तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत मागणी केली होती. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या सहीचे उत्तर मिळाले. ज्यात धक्कादायक बाब आता समोर आली आहे. ज्यात
‘महाराष्ट्र सरकारने उंची वाढीच्या विरोधात प्रस्तावच सादर केलेला नसल्याचे आता समोर येत असून जल लवादाने उंची वाढीला मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रच काय तर कोणत्याच राज्याने (आंध्र प्रदेश, तेलंगणा) विरोध केलेला नाही. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, तर राज्यात भाजप-महायुती सत्तेत आहे. उंची वाढविण्याच्या मुद्द्यावर भाजपकडून राजकारण केले जात आहे. काहीजण काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंग देत असल्याचा आरोप देखील खासदार पाटील यांनी केला आहे.
अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. पाच मीटरने उंची वाढविल्यास अलमट्टीची पाणी पातळी शिरोळ बंधार्यापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे पावसाळ्यात सांगली व कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली जातील असा दावा याआधीच जलतज्ज्ञांनी केला आहे.
यावरूनच दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांसह जनता वारंवार आवाज उठवत आहे. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्राचा विरोध असून तांत्रिक समिती नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आता केंद्रीय जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील यांनी दिलेल्या उत्तरामुळे खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.