
Sangli News : सांगलीच्या राजकारण सध्या मोठ्या घडामोडी होताना दिसत असून मोठे पक्ष प्रवेश होत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून, तथा माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आज (ता.16) जाहीर केला. बुधवारी (ता.18) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.
दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी ‘विजय’ बंगल्यावर जयश्री पाटील यांची भेट घेतली. त्याआधी रविवारी रात्री उशीरापर्यंत मदनभाऊ गटाशी भाजप नेत्यांनी चर्चा सुरू होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जयश्री पाटील यांची मोबाईलवरून चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
‘विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसने निलंबित केले होते. त्यानंतर आम्हाला कोणत्या तरी पक्षात जाणे गरजेचे होते. कार्यकर्त्यांची भावना राष्ट्रीय पक्षात जावे, अशाच होत्या. त्या मताचा आदर करत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला आहे. त्यांचे नेतृत्व आश्वासक वाटतं असल्याचेही जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा पाटील यांनी सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण केले. तळातील माणसाच्या विकासासाठी ते काम करायचे. त्यांचे नेचर हे भाजपच्या नेचरशी मिळते जुळते आहे. त्यामुळे वसंतदादा घराण्यातील जयश्री पाटील या भाजपमध्ये चांगले काम करू शकतील.’’
दरम्यान, वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या जयश्री पाटील या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. याआधी माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत वावड्या उठल्या होत्या. अलिकडे खासदार विशाल पाटील यांनादेखील सतत भाजपसोबत येण्याचे आवतन दिले जात आहे.
त्याआधी वसंतदादांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी मदन पाटील हेही राष्ट्रवादीत गेले होते. पुढे 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीविरोधात बंड केले. ते अपक्ष निवडणूक जिंकले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले आणि पुढे ते कॅबिनेट मंत्रीही झाले.
2015-16 ला त्यांच्या निधनानंतर जयश्री पाटील यांनी त्यांच्या गटाचे नेतृत्व स्विकारले. गेल्या विधानसभा निवडणूकीत त्या अपक्ष लढल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केलीय. ही घोषणा काँग्रेससह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जातेय. तर जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.