
Solapur, 06 April : पाणी अडविणाऱ्या खासदाराला तुम्ही निवडून दिलं आणि पाणी देणाऱ्या माणसाला तुम्ही घरी बसवलं, असे सांगून ‘काय पाप केलं तुम्ही असे’ असे म्हणून स्वतःच्याच थोबाडीत मारून घेणारे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माळशिरस तालुक्यातील पिलिवला मी मिळालेले पाणी विजयदादांनी घालविण्याचे काम केले आहे, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माझ्यावर आरोप करू नयेत, असे उलट चॅलेंज शहाजीबापूंनी मोहिते पाटील यांना दिले आहे.
माजी आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) म्हणाले, तोंडात मारून घेणे, हा पश्चातापाचा भाग होता आणि तो सर्व जनतेला माझा हेतू कळालेला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. त्यात त्यांनी पाण्यासंदर्भात आम्ही कुठं अन्याय केलेला नाही. उलट शहाजीबापू पाटील यांनीच माळशिरसचे पाणी पळविले आहे, असे म्हटले आहे.
(स्व) गणपतराव देशमुख यांनी २००१ मध्ये उजनी धरणाच्या सांगोला (Sangola) तालुक्यासाठीच्या पाणी योजनेची प्रशासकीय मान्यता घेतली होती. त्यानंतर २००५ मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने ही प्रशासकीय मान्यता रद्द केली. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी २००१ चे प्रशासकीय परिपत्रक काढून बघावे. पिलिवच्या महालिंगरायाच्या टेकडीपासून पाणी देण्याचे धोरण होते. या टेकडीपासून सांगोला विधानसभा मतदारसंघाला म्हणजेच संगोला तालुका आणि माळशिरस तालुक्यातील पिलिव भागाला सुमारे ३. ८१ टीएमसी पाणी देण्याचं ठरलं होतं, असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
तत्कालीन जलसंपदा मंत्री महादेवराव शिवणकर यांनी मला सांगोला तालुक्यासाठी ३. ८१ टीएमसी पाणी दिलं होतं. उर्वरीत ३. ८१ टीएमसी पाणी जिल्ह्यातील राहिलेल्या तालुक्यांना होते. पण, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर १.८१ टीएमसी म्हणजेच जवळपास दोन टीएमसी पाणी हे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्याला नेण्यात आले. दोन टीएमसी पाणी हे सांगोला तालुक्याला देण्यात आले.
सांगोला आणि पिलिव भागाचे १.८१ टीएमसी पाणी परांड्याला नेण्याचा निर्णय झाला, त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी पिलिव भागाच्या पाण्यासाठी कोणताही लढा दिला नाही. त्यांनी त्या भागासाठी पाणी मागितलं नाही. पिलिव भागाचे पाणी घालवण्याचे खरं काम हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी माझ्यावर पिलिवचे पाणी पळविण्याचा आरोप मुळीच करू नये. उलट मी पिलिवसह पाणी मागितलं होतं. मला ते मिळालंही होतं. पण, मी मिळविलेले पाणी घालवण्याचे काम मोहिते पाटील यांनी केले आहे, असा गंभीर आरोपही शहाजीबापू पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.