
Solapur, 07 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जबाबदार नेतेमंडळी चांगल्या व्यक्तींना घेऊन बिनविरोध करत असतील, तर माझी काही हरकत नाही. मात्र, संचालक मंडळात येणाऱ्या लोकांचा हेतू चांगला पाहिजे. हेतू ठेवून संचालक मंडळात कोणी येत असेल किंवा शेतकऱ्यांविषयी त्यांचा दृष्टीकोन चांगला पाहिजे, तरच मी बिनविरोध निवडणुकीला तयार आहे. मात्र, कोणालाही घेऊन बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत असतील तर मी त्याला तयार असणार नाही, असे सांगून काँग्रेसचे माजी आमदार तथा बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने यांनी निवडणुकीबाबतचे पत्ते ओपन केले.
दिलीप माने (Dilip Mane) म्हणाले, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच ४५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत १६ एप्रिलपर्यंत असून २७ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक गटातून उमेदवारी अर्ज भरायला सांगितले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरून ठेवले आहेत.
कोणासोबत युती करायची, कोणाला सोबत घ्यायचं, कोणाबरोबर जायचं, याचा निर्णय अजून आम्ही घेतलेला नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून शेतकरीहिताचा निर्णय करणारे, शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही अजूनही कुठली बैठक घेतलेली नाही. पण आमचा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात (Solapur Bazar Samiti Election) येत्या चार-पाच दिवसांत आम्ही निर्णय जाहीर करणार आहेात. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू राहणार आहे, असेही माने यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार माने म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे. बाजार समितीतील चोऱ्या आणि भ्रष्टाचार थांबला पाहिजे. बाजार समितीत शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था झाली पाहिजे. शेतीमाल पावसात भिजू नये, याबाबतचा माझ्यापुढे दृष्टीकोन माझ्यापुढे आहे. याशिवाय नवनवीन योजना राबविण्याचा मानस माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आहे.
मागील निवडणुकीत सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना आम्ही सोबत घेतलं होतं. त्या वेळी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार होता. निवडणुकीत निवडून येण्यासाठी आपल्याला कोणाला तरी सोबत घ्यावं लागतं, त्यानुसार देशमुख यांना आम्ही मागील निवडणुकीच्या वेळी सोबत घेतले होते. विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी माझी चर्चा झाली. मात्र, बाजार समिती निवडणुकीबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांनी विषयसुद्धा काढला नाही, असेही दिलीप माने यांनी आवर्जून सांगितले.
‘जयकुमार गोरेंच्या निर्णयाबाबत मला कल्पना नाही’
बाजार समितीच्या निवडणुकीत टोकाची भूमिका घेऊन कोणी संघर्ष करू नये. सर्वांनी एकत्र येऊन बाजार समितीची निवडणूक बिनविरोधी करावी, असं जयकुमार गोरे यांचं मत असेल. पण त्यांनी अजून हा विषय काढलेला नाही. येत्या १६ तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे, त्यामुळे थोडा वेळ घेतील. पण त्यांचा काय निर्णय आहे, त्याबाबत मला कल्पना नाही, असेही दिलीप माने यांनी स्पष्ट केले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.