

Solapur, 14 April : शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्याला पालकमंत्री गोरे यांनी उत्तर देताना काही गर्भित इशारे दिले आहेत. ते मला भेटून काय विनंती करत होते, त्यांचा शिवसेना प्रवेश का झाला, हे मी सांगू शकतो. पण, ती आज वेळ नाही. मात्र ज्या दिवशी डोक्यावरून जाईल, त्या दिवशी सगळं सांगेन, असा इशारा गोरे यांनी भगीरथ भालके यांना दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विविध विषयावर भाष्य केले. त्या वेळी त्यांनी भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्यावर टोलेबाजी केली.
ते म्हणाले, भगीरथ भालके हे भारतनानांचा वारसा सांगतात, पण भगीरथ भालके हे कदाचित भारतनाना आणि जयकुमार गोरे यांचे संबंध विसरले आहेत. भारतनाना यांना जेव्हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता, तेव्हा ते दोन महिने मुंबईत थांबले होते, त्यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री या सर्वांच्या भेटीवेळी याच जयकुमार गोरेने (Jaykumar Gore) मदत केली होती.
कोणी अरे तुरे बोलावे किंवा काय करावे, हे ज्याची त्याची संस्कृती असते. मला वाटतं भगीरथ भालके यांनी त्यांची संस्कृती दाखवली आहे. दिवंगत भारतनाना यांना हे बिलकुल अपेक्षित नाही. पंढरपूरवासियांना देखील हे अपेक्षित नाहीए, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
जयकुमार गोरे म्हणाले, भगीरथ भालके काय म्हणतात, त्याला बिलकुल महत्व नाही. निवडणुकीमध्ये एकमेकांवर टीका केली जाते. माझ्या निधीची त्यांना बिलकुल आवश्यकता राहिली नाही. निधी देणारी खूप मोठी माणसं आता त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा आहे.
भगीरथ भालके हे किती वेळा मला येऊन भेटले, माझ्या पाठीमागे कशासाठी लागले होते, ते वेळ आल्यावर मीदेखील सांगू शकतो. राजकारणामध्ये काही गोष्टी असतात, ज्या सार्वजनिक करायच्या नसतात. ते कुठे भेटून मला काय विनंती करत होते, हे सगळं मलाही सांगता येईल. पण मी हे कधीही सांगणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेमध्ये भालके यांचा प्रवेश का झाला, हे देखील मी सांगू शकतो. पण आज ती वेळ नाही, राजकारणामध्ये आचारसंहिता पाळणारा मी कार्यकर्ता आहे. मी आचारसंहिता जरुर पाळीन. पण, ज्या दिवशी माझ्या डोक्यावरून जाईल, त्या दिवशी मी सगळंच सांगेन, असा इशारा भालकेंनी दिला.
पक्षवाढीचा सगळ्यांना अधिकार : गोरे
शिवसेना प्रवेशाबाबत पालकमंत्री गोरे म्हणाले, पक्षवाढीचा सगळ्यांना अधिकार आहे. जर त्यांनी पक्ष वाढवला तर तो विचार वाढवला. आम्ही वाढवला, तर आम्ही वॉशिंग मशीन अशा पद्धतीच्या चर्चा होतात. पक्ष वाढविण्याचा जसा त्यांना अधिकार आहे, तसा आम्हालाही आहे. आगामी काळात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरवून काम करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे कोणाच्या प्रवेशावर उत्तर किंवा कोणाच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.