
Sangli News : सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील वारसदार जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे एकीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे अपक्ष खासदार विशाल पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याही भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिश्कील वक्तव्य करत भाजपला टोला लगावला आहे. तर पत्रकारांची देखील फिरकी घतली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली आहे. (Jayant Patil gives witty response to BJP entry rumours as Devendra Fadnavis avoids comment)
राज्यात सध्या महायुतीत प्रवेशासह काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गळती लागल्याचे समोर येत आहे. अनेक नेते भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाताना दिसत आहेत. नुकताच जयश्री पाटील (jayshree patil) यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सांगलीतील दोन मोठी राजकीय घराणेही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
या चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विषयाला बगल दिल्याचे दिसत आहे. जयश्री पाटील यांचा मुंबईत प्रवेश झाल्यानंतर फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. यानंतर पत्रकारांनी त्यांना, सांगली जिल्ह्यातील आणखी कोणते मोठे घराणे भाजपमध्ये येणार आहे का? बहुप्रतिक्षित आहे, असा सवाल केला. त्या प्रश्नावर मात्र फडणवीस यांनी नो कमेंट करत बोलणे टाळले आहे. पत्रकांराचा रोख हा जयंत पाटील यांच्याकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी यावर कोणतेच उत्तर दिलं नाही. उलट, ते प्रतिक्षेत आहेत, असे तुम्हाला वाटते. पण सध्या तरी आमच्यासमोर तशी चर्चा नाही आणि जे घराणे यायचे होते, ते आमच्यासोबत आले असल्याचे सांगितले. यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला तुर्त तरी ब्रेक लागल्याचे समोर आले आहे.
पण याच वेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबतच्या सततच्या चर्चेवर मोठे मिश्किल भाष्य केले. त्यांनी पत्रकारांची फिरकी तर घेतलीच सोबत भाजप देखील आपल्या खास शैलीत टोला लगावला. जयंत पाटील म्हणाले, भाजप फार मोठा पक्ष झाला आहे. देशातच नाही तर जगातला मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे इतकी मोठ मोठी लोक जात आहेत, तिथे माझ्यासारख्या गरीबाचे काय काम? तुम्ही मला गरिबाला का सारखं वेठीस धरता? मी भाजपमध्ये जावं हे तुम्ही मिडियावालेच उठवता. कदाचित त्यांनाही तसं वाटत नसेल.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या माझ्या भेटी विरोधी पक्ष नेता म्हणून आहेत. इतर कामासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का? तुम्ही मात्र गैरसमज करून घेऊ नका, असा टोला देखील त्यांनी पत्रकारांना यावेळी लगावला आहे. तर जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर ते म्हणाले, यशवंतराव-वसंतदादांच्या विचारांच्या कष्णाकाठची माणसे विचाराला पक्की होती, याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला हवं. पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले. यावर मी बोलणार नाही, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.