
Sangli News : सांगली जिल्ह्यात काँग्रेससह जयंत पाटील यांना धक्का देत काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला होता. ज्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील भाजपवर निशाना साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील जनतेला देखील उद्देशून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे सध्या सांगलीसह राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. (Jayant Patil criticizes BJP after Congress rebel leader Jayshree Patil joins)
गेल्या काही दिवसापासून जयश्री पाटील (Jayshree Patil) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण ऐन वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुत्रे हलवली आणि बुधवारी (ता.18) त्यांचा मुंबई भाजप प्रवेश झाला. जयश्रीताईंच्या या प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह सांगलीतील भाजप नेत्यांसह मदन पाटील गटातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पण त्यांच्या प्रवेशावरून सांगलीतील काही भाजप नेते नाराज होते असेही समोर आले आहे. ज्या पद्धतीने सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश वादग्रस्च ठरला तसाच जयश्री पाटील यांचा पक्ष प्रवेश वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण हा पक्ष प्रवेशच कमी वेळेत झाल्याने नाराजांना वाव मिळाला नाही.
पण आता त्यांच्या प्रवेशानंतर अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासह जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी, भ्रष्टाचाराचे बेलगाम आरोप करून जेरीस आणायचे आणि पुन्हा पक्षात घेऊन पवित्र करायचे ही प्रवेशाची नवी पध्दत भाजपने सुरू केल्याची टीका केली आहे. तसेच ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झालेत. त्यांनाच भाजप सध्या पायघड्या घालत असून अशांना आपल्या पक्षात घेण्यावर भर देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
तर ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झालेत ते आज उजळ माथ्याने पक्ष प्रवेश करताना दिसत असून लोकांनाही त्या आरोपाचाही विसर पडत असल्याने खेद व्यक्त केला आहे. सध्या असे लोक आधी काय केलं होतं? हे विसरून नवीन वाटचाल सुरू करताना दिसत आहेत. ज्यांना पक्षात प्रवेश दिले त्यांच्याविरोधात भाजपच्या नेत्यांची भाषणे, विधानसभेतील वक्तव्ये सर्वत्र गाजत आहेत. त्यांच्यावर टीका केली त्यांचाच ही मंडळी सत्कार करतात. हे लोकांना कळायला हवं, अशीही अपेक्षा व्यक्त केलीय.
माझ्या गरीबाचे तिथे काय काम?
दरम्यान भाजप प्रवेशाबाबतच्या सततच्या चर्चेवर मिश्किल भाष्य करत जयंत पाटील म्हणाले, भाजप फार मोठा पक्ष झाला आहे. देशातच नाही तर जगातला मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे इतकी मोठ मोठी लोक जात आहेत, तिथे माझ्यासारख्या गरीबाचे काय काम? तुम्ही मला गरिबाला का सारखं वेठीस धरता? मी भाजपमध्ये जावं हे तुम्ही मिडियावालेच उठवता. कदाचित त्यांनाही तसं वाटत नसेल.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या माझ्या भेटी विरोधी पक्ष नेता म्हणून आहेत. इतर कामासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का? तुम्ही मात्र गैरसमज करून घेऊ नका, असा टोला देखील त्यांनी पत्रकारांना यावेळी लगावला आहे. तर जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर ते म्हणाले, यशवंतराव-वसंतदादांच्या विचारांच्या कष्णाकाठची माणसे विचाराला पक्की होती, याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला हवं. पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले. यावर मी बोलणार नाही, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.