
Gopichand Padalkar Faces Sharp Criticism : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आज पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस आमदार विश्वजित कदमही सहभागी झाले. त्यांनी संस्कार, संस्कृतीचे दाखले देत पडळकरांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
मोर्चामध्ये खासदार विशाल पाटील हेही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सांगली जिल्हा महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जातो. या जिल्ह्यात अनेक दिग्गज नेते होऊन गेले, त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच समाजकारणात वेगळे स्थान निर्माण केले आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
राजकारण हे असे क्षेत्र आहे की यामध्ये वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, पण या नेत्यांनी विरोधकांवर कधीही वैयक्तिक किंवा कौटुंबिक टीका केली नाही, याचा आदर्श आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. पण काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदाराने जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली, तसेच लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला, अशी खंत आमदार कदम यांनी व्यक्त केली.
सगळ्यांना दिग्गज मंडळींनी या सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच एकमेकांचा आदर सन्मान राखला. अलीकडचा काळ दुर्दैवी आहे, कुठेतरी राजकीय खंड पडलेला आहे. पक्षाच्या नेतृत्वासमोर किंवा कुठेतरी त्यांना नेत्यांच्या समोर प्रसिध्दी मिळावी, असं वाटतं. लवकर आपल्याला काहीतरी मिळावे, म्हणून असे बोलण्याचे पाप काही जण करत असल्याची टीका विश्वजित कदम यांनी पडळकरांवर केली.
जिल्ह्यात नेत्यांनी कधी जातीभेद केला नाही. आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आहोत. राजकीय पोळी कोणी भाजत असेल तर त्याला बळी पडू नका. राजकारण बाजूला ठेवून चुकीचे असेल त्याला विरोध केला पाहिजे, असेही विश्वजित कदम यांनी स्पष्टपणे नमूद केले. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही आदर, सहकार्य, एकोपा आणि सुसंस्कृत राजकारण याचे उत्तम उदारण आहे. राज्याच्या राजकारणात आदर आणि संस्कृती टिकवणे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे, असेही कदम म्हणाले.
दरम्यान, या मोर्चामध्ये विशाल पाटील यांचा सहभागही महत्वाचा मानला जात आहे. मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, भास्कर भगरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी झाले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभागी होत सांगलीतील राजकीय संस्कृतीचे दर्शन घडविले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.