Kolhapur News, 18 Jun : राज्यात रुग्णवाहिका वेळेत न पोहचल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडत आहेत. या घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता, रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे.
त्याला कारणीभूत कोल्हापूरातील वाढणारी वाहतूक कोंडी आहे. कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. या कोंडीमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे पालकमंत्रीसाहेब वाहतुकीची कोंडी सोडवून आरोग्यमंत्र्यांच्या खात्यातील रुग्णवाहिकेला वाट करून द्या! अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय गोरगरिबांचं आधारवड आहे. जिल्हा सह रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातून रोज हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. काही वेळा अपघात तर काही वेळा दुर्दैवी घटनातून रुग्ण सीपीआरकडे धाव घेत असतात. मात्र रुग्णालयात येण्यापूर्वी ग्रामीण भागातील रुग्णांना प्रवेशद्वारावरच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
कोल्हापूर गगनबावडा रोड, कोल्हापूर गारगोटी, तावडे हॉटेल ते ताराराणी चौक, शुगर मिल ते कसबा बावडा, आंबेवाडी ते सीपीआर चौक या ठिकाणी नित्याचीच वाहतूक कोंडी ही समस्या बनली आहे. रोज सकाळी साडे आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत शहरात कामासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत शहरातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या ही तितकीच आहे.
कोल्हापूर शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी केलेली अतिक्रमण, शहरातील अरुंद रस्ते त्याला कारणीभूत आहेत. शिवाय वाहतूक शिस्तीचा भाग अनेकांना नसल्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. वाहतूक पोलीस किंवा कोल्हापूर महानगरपालिकेकडून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर कोणतीच कडक कारवाई होताना दिसत नाही.
काही वेळा राजकीय लोकप्रतिनिधीच मध्यस्थी करतात. अतिक्रमण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हात आर्थिक रंगाने रंगल्याची देखील चर्चा आहे. परिणामी ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णवाहिकेला त्याचा फटका बसत आहे. रोज जवळपास शंभरहून अधिक रुग्णवाहिका कोल्हापुरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात येताना दिसतात.
सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आहेत. शिवाय राज्याचे ते सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत. त्यांच्याच अत्यारिखित रुग्णवाहिका विभाग येतो. राज्यात रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने माखोडा, डहाणू, मुंडणगड गर्भवती आणि बाळांचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत.
त्यावरून राज्याचे आरोग्यमंत्री त्यांच्यावर टीकेची झोड उडत आहे. अशातच ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच जिल्ह्यातील रुग्णवाहिकेची अवस्था वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहे. पालकमंत्री यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कोल्हापूर महापालिका, वाहतूक पोलीस यांचे वेळेत कान टोचणे आवश्यक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.