

गोकुळ निवडणुकीतील जागावाटप चर्चेत भाजपला सर्वाधिक जागा देण्यास महायुतीतील नेत्यांनी सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे.
शासन नियुक्त संचालक पदांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला सन्मानजनक प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणुकीपूर्वी दाखल झालेल्या चौकशी याचिका थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
kolhapur News : गोकुळ दूध संघावर सहा महिने प्रशासक ठेवून गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे सहा महिने ढकलण्याची रणनीती आखण्यात आली होती. वारंवार सत्ताधाऱ्यांवर निवेदन, चौकशी आणि न्यायालयिन याचिका दाखल करून दबाव टाकण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी झाला आहे. गोकुळ महायुती म्हणून लढत असताना सुरवातीला भाजपला कमी जागा देण्याची तयारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवली होती. मात्र त्यानंतर जे राजकारण झालं त्याने गोकुळ दूध संघाचे राजकारण ढवळून निघाले. जेरीस आणलेल्या सत्ताधाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी तडजोडी केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत सर्व काही ठरलं असून भाजपचं गोकुळ दूध संघात मोठा भाऊ ठरणार आहे, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसापूर्वी गोकुळ दूध संघाची निवडणूक समीप आल्याची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर त्यांनी शेंडा पार्क येथे गोकुळमधील काही संचालकांची भेट घेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा झाली याचा वृतांत सांगितल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक काही दिवसापूर्वी पार पडली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री हसन मुश्रीफ, उदय सामंत उपस्थित होते. बैठकीदरम्यान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. या निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
जागावाटपाच्या चर्चेत सुरवातीला भाजपला कमी जागा देण्याची तयारी केलेल्या मंत्री मुश्रीफ आणि शिवसेनेच्या नेत्यांनी गोकुळमध्ये भाजपला सर्वाधिक जागा देण्याचे मान्य केल्याचे वृत्त आहे. शिवाय शासन नियुक्त संचालकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला सन्मान देण्याचे ठरले असल्याचे समोर आले आहे. शिवाय महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या याचिका चौकशी प्रशासकाच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत. त्या थांबवण्याच्या निर्णय झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोल्हापुरात होणार महायुती नेत्यांची बैठक
सोमवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबईत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरातील महायुतीची स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन समज- गैरसमज दूर करण्याचं सल्ला दिला आहे. शिवाय जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा करण्याचे सांगण्यात आले आहे.
२५ पैकी सर्वाधिक जागा भाजपला देण्याचा निर्णय घेण्याचे सांगण्यात येते. त्यावर कोल्हापुरात येत्या शनिवारी किंवा रविवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागावाटपचे प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. भाजप १४ जागांसाठी आग्रही आहे. मात्र यावर काय निर्णय होणार? यावर पुढील घडामोडी अवलंबून आहे. मुख्य निवडणूक कार्यक्रम, अंतिम जागावाटप आणि चेअरमनपदाचे रोटेशन याबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे.
अशा आहेत पुढील अडचणी
निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेला मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. महायुतीच्या घटक पक्षांचे एकमत झाले असले तरी येणाऱ्या ठरावावर न्यायालयीन हरकती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवसायनातील संस्थांचा निर्णय झाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश दिले होते. याच आदेशाचा संदर्भ घेऊन मतदार यादी कार्यक्रमात अडथळे येऊ शकतात. त्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याचे शक्यता आहे.
अचानक आदेश आला...
गेल्या अनेक दिवसापासून गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला उकळी फुटली आहे. अशातच आरोप- प्रत्यारोपांनी गोकुळचा आखाडा तापला असताना गोकुळचे ठराव गोळा करण्याची तारीख जाहीर झाली. अचानक आलेल्या आदेशामुळे कुठेतरी डाळ शिजली आहे. याचा अंदाज सर्वांना आला आहे. मात्र भाजपचे आमदार शिवाजी पाटील आणि गर्जना संघटनांचे प्रकाश बेलवाडे यांच्या पाठीमागे राज्यातून वरिष्ठ शक्तीचा हाथ नक्की होता हे दिसून येते.
महायुतीच्या चर्चेनुसार भाजपला सर्वाधिक जागा देण्याचे मान्य झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महायुतीच्या माध्यमातून चर्चेत सहभागी आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीला सन्मानजनक प्रतिनिधित्व देण्याचे ठरल्याचे वृत्त आहे.
निवडणुकीपूर्वी दाखल झालेल्या काही चौकशी याचिका थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुती एकत्र राहिल्यास निवडणुकीत राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.