
Kolhapur, 11 February : कोल्हापूर, सांगलीत येणाऱ्या सततच्या महापुराला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात सांगली आणि कोल्हापुरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या भूमिकेवर राजकीय नेत्यांनी मात्र स्वतःची पोळी भाजून घेतल्याचे चित्र आहे. वरवरचा विरोध करून राजकीय स्टंट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी विरोध करणारा कागदोपत्री पुरावाच सरकार दप्तरी दिला नसल्याचे उघड झाले आहे.
सांगलीचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत कोणत्याच राज्याचा विरोध नसल्याची धक्कादायक माहिती दिल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील राजकारण्यांचे पितळ उघडे पडले आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर सांगली, साताऱ्यातील नेत्यांनी सारवासारवीची भूमिका घेतली आहे.
अलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील असताना महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीला फटका बसतो. कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी याबाबत कायम विरोधातील भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही, अशी भूमिका यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक यांसह महायुती आणि महाविकास आघाडीतील अन्य राज्यकर्त्यांनी भूमिका घेतली होती.
राज्यकर्त्यांची ही भूमिका केवळ काळापुरतीच मर्यादित राहिली आहे. कारण, धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्राने कधीही विरोध नोंदवला नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांनी संसदेत दिले आहे. त्यामुळे अशा राज्यकर्त्यांचा वरवरचा विरोध जनतेसमोर उघड झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरचा महापूर येथील राज्यकर्त्यांसाठी ‘इव्हेंट’ बनला आहे.
राज्यकर्त्यांचे हे पितळ उघड पडल्यानंतर लोकप्रतिनिधींनी सारवासारवीची भाषा सुरू करून पुन्हा एकदा जनतेच्या मनात घर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पावसाळ्यात अलमट्टीच्या फुगवट्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागतो. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या भूमिकेला येथील जनसामान्यांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे, त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल. कर्नाटक प्रशासनाची तत्काळ बैठक घेऊन चर्चा केली जाईल, अशी भूमिका पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.
जर कुणी आक्षेप घेतला नसल्याचे पत्र केंद्रीय मंत्रिमंडळाकडे नसेल तर याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत उंची वाढवू दिली जाणार नाही, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. मात्र, इतक्या वर्षांचा कालावधी लोटूनही अलमट्टीबाबत राज्यकर्त्यांनी कागदोपत्री केंद्र सरकारकडे पाठपुरावा का केला नाही? याचा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.