Mahadevi Elephant: कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची रवानगी गुजरातमधील अंबानींच्या वनतारा प्राणी कल्याण प्रकल्पात रवानगी करण्यात आली आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी याविरोधात आवाज उठवला, आंदोलन केलं. पण सुप्रीम कोर्टानं हत्तीणीची रहावनगी वनतारात करण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सर्वांचाच नाईलाज झाला होता. पण आता या हत्तीणीच्या प्रेमापोटी ग्रामस्थांनी थेट राष्ट्रपतींकडं दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी सह्य्यांची मोहिमही सुरु केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी नांदणी येथील मठाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
या भेटीनंतर सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, गेली अनेक वर्षे ही केस कोर्टात सुरु होती. दुर्दैवाने पेटानं एचपीसीकडं अर्ज केला की, हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे, तिथून शंकेला सुरुवात होते. एखाद्या प्राण्याची व्यवस्था नीट होत नसेल, तर पेटा त्या संदर्भात आपलं मत मांडत असते. मत मांडताना तो हत्ती गुजरातला गेला पाहिजे, ही भूमिका पेटाने पहिल्यांदा आपल्या याचिकेत घेतली होती. त्यानंतर डॉक्टरांनी येऊन हत्तीची तब्येत चांगली असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर हायकोर्टाने पहिल्या टप्प्यात स्थगिती दिली होती, पण दुसऱ्या टप्प्यात काही अडचणी आल्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ताबडतोब हत्ती देण्याची भूमिका घेतली, आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्याचा आदेश दिला. 21 जुलैला नांदणीचे शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते. त्याचवेळी मी माझी भूमिका घेतली होती. आमची भूमिका समाज, हत्ती आणि मठाच्या बाजूने आहे.
पण यामुळे जैन समाज, हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा काम या सगळ्या प्रकरणात झालं. गेली तीस वर्षाहून अधिक काळ मठाने ज्या हत्तीची जपणूक केली, तो घेऊन जाण्याचे पाप या मंडळींनी केलं आहे. याबाबत एक गुगल फॉर्म काढण्यात आला असून याद्वारे राष्ट्रपतींना विनंती केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन आमचे हात बांधले आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमचा हत्ती परत द्यावा, अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा आहे. ही सह्यांची मोहीम सुरु केल्यानंतर देशभरातून आणि परदेशातून फोन येत आहेत. लोकांच्या भावना तीव्र आहेत, म्हणून दोन दिवसात सह्यांची निवेदने राष्ट्रपतींना पाठवणार आहेत.
याप्रकरणी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी 6 महिन्यांपूर्वी लोकांना शब्द दिला होता, पण यात त्यांनी काय मदत केली आणि काय नाही? आमची सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी यामध्ये त्वरित हस्तक्षेप करावा. उद्या मठाचे कामकाज व्यवस्थित नाही म्हणून तुम्ही मठाबाबत देखील वेगळ्या भूमिका घेऊ शकता. वेगळ्या पद्धतीने काहीतर षडयंत्र चाललं आहे असं वाटतं. हत्तीच्या माध्यमातून ही फक्त सुरुवात आहे.
दरम्यान, कोल्हापूरकरांनी अनोख्या पद्धतीनं कोर्टाच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला. तब्बल हजारो लोकांनी जिओची टेलिकॉम सेवा बदलून ती इतर कंपनीमध्ये पोर्ट केली होती. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे माझी भूमिका धार्मिक आहे. हत्तीच्या संदर्भातली भूमिका माझी आहे. गुजरातला हत्तींची आवश्यकता असेल, तर चंदगड पासून सगळीकडे प्रचंड आहेत. तिथली गावं म्हणत आहेत की आम्ही स्वतः पकडून द्यायला तयार आहोत. जिथे लोकांना त्रास होतोय, तिथले तुम्ही घेऊन जा. परंतू धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कोणाला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.