
Kolhapur News : नुकताच झालेली विधानसभा निवडणुकीत राज्यात चमत्कार झाल्याचा भास महायुतीतील नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांना झाला. यावेळी अनेक ठिकाणी मात्तबरांना धक्का बसला. तर नवख्यांना आमदार होण्याची संधी मिळाली. तर काही ठिकाणी जुन्यांनीच आपला गड राखला. कागल मतदार संघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तगडा उमेदवार समरजित घाटगे यांच्या रूपाने दिला होता. निवडणुकीत अत्यंत आक्रमकपणे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे कागलमध्ये काय होणार? मुश्रीफ गड राखणार की पारंपारीक विरोधक समरजित घाटगे बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला गेली होती. पण निकाल लागला आणि मुश्रीफांनी गुलाल उघळला.
या गोष्टीला आता जवळपास सहा महिने होत असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेला आपणही घाबरलो होतो. निकालाची भीती वाटतं होती, असे स्पष्टीकरण आता दिलं आहे. यामुळे कागल करांसह राज्यातील अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ते तालुक्यातील मौजे सागाव येथील कामाचे उद्घाटन करत असताना बोलत होते.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आल्या होत्या. कागलमध्ये देखील शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या मुश्रीफांच्याविरोधात तगडा उमेदवार उतरवला होता. शरद पवार यांनी मुश्रीफांच्याविरोधात भाजपला निवडणुकीच्या तोंडावर रामराम ठोकलेल्या समरजीत घाटगे यांच्या हातात तुतारी दिली होती. यामुळे येथे दोन कट्टर विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले होते.
शरद पवार यांनी देखील अत्यंत आक्रमकपणे मुश्रीफ यांच्याविरोधात प्रचार करण्यास सुरूवात केली होती. तसेच गद्दारी करणाऱ्याला आता पाडा असे आवाहन केले होते. फक्त शरद पवारच नव्हे तर मुश्रीफ यांच्याविरोधात प्रचारात खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्या बहीण आणि माजी मंत्री एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी उडी घेतली होती. यामुळे अनेकांना आता मुश्रीफांचे यंदा काही होणार नाही, असाच समज झाला होता.
असाच समज वजा भीती मुश्रीफांच्या मनात निर्माण झाली होती. याबाबत आता त्यांनी कबुली दिली आहे. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, आपण विधानसभेवेळी निकालाच्याआधी घाबरलो होतो, मनात भीती होती असे मान्य केलं आहे. यावेळी त्यांनी, आपल्या पराभवासाठी शेकडो प्रयत्न करण्यात आले. निवडणूक जातीयवादावर आणण्यात आली. पण मी कोणत्या जातीत जन्माला याव हे माझ्या हातात नसले तरी चांगले काम करणे माझा हातात आहे. माझ्या समोर उभे असलेले तगडे आव्हान, निर्माण झालेली राजकीय परिस्थितीमुळे मी देखील थोडा घाबरलो होतो. मात्र मतदारसंघातील गोरगरीब जनता व माजी आमदार संजय घाडगे हे माझ्यामागे उभे राहिल्यानेच मी विजयी झालो असेही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच त्यांनी भैय्या माने यांच्याबाबत मोठा घोषणा देखील केली. ज्यामुळे कागलमध्ये भविष्यात दोन आमदार होतील. मुश्रीफांनी भैय्या माने यांना पदवीधर मतदारसंघाचा आमदार करणार असल्याचेही घोषणा करताना कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीसाठी कामाला लागण्याचे आदेशही दिले.
नुकताच झालेल्या निवडणुकीत कागलमध्ये तिरंगी लढत झाल्याने मुश्रीफांचा विजय सुकर झाला होता. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत मुश्रीफ विजयी होतील अशी गॅरंटी देता येत नव्हती. पण येथे माजी आमदार संजय घाडगे उभारल्याने मतांची विभागणी झाली आणि मुश्रीफ यांनी समरजित घाटगेंचा 11 हजार 609 मतांनी पराभव केला. त्यामुळे कागलची लढाई राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात चर्चेचा विषय झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.