
Solapur News : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघातली निवडणूक चांगलीच गाजली होती. या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नेत्यांमधला वाद शरद पवारांच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडला आणि मोहोळमध्ये 'तुतारी' वाजली. त्याचमुळे राज्यभर चांगलं यश मिळवत धडाकेबाज कामगिरी केलेल्या अजित पवारांना मोहोळ मतदारसंघ मात्र राखता आला नाही.
यावेळी मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देत उघडपणे विरोधी उमेदवाराचं काम केलेल्या उमेश पाटलांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा अजित पवारांच्या उपस्थितीत घरवापसी केली. यावेळीही त्यांनी राजन पाटलांवर हल्लाबोल केला होता. आता राजन पाटलांच्या (Rajan Patil) चिरंजीवानं उमेश पाटलांवर अगदी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या घरवापसीनंतर मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. माजी आमदार राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील संघर्ष पेटला आहे. उमेश पाटलांचं नाव न घेता राजन पाटलांचे पुत्र अजिंक्यराणा पाटील यांची शाब्दिक हल्ला चढवला आहे. कुत्रं परत येतंय म्हणून अजितदादांनी त्यांना परत गाडीखाली (पक्षात)घेतले,अशी जिव्हारी लागणारी टीका त्यांनी केली आहे.
अनगरचे माजी सरपंच आणि राजन पाटलांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटलांवर टीकेची तोफ डागली आहे.ते म्हणाले,त्यांना कोणीही कोणत्याही पक्षात घेतले नाही,म्हणून हे राष्ट्रवादीत परत आले.कुत्रं परत येतंय म्हणून अजितदादांनी यांना परत गाडीखाली (पक्षात)घेतलं. बूट चाटून कधी राजकारण करू नये असे म्हणतात, पण ती व्यक्ती बूट काय,बुटाखालील माती पण खाईल,असा बोचणारा वार अजिंक्यराणा पाटील यांनी नाव न घेता उमेश पाटलांवर केला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी उमेश पाटलांना बैलगाडी खालील कुत्रं अशी उपमा दिली होती. त्याचाच संदर्भ घेत आता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेश पाटलांवर निशाणा साधला. मोहोळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेश पाटलांनी राजन पाटलांविरोधात मोहीम उघडत बंडखोरी केली होती. तसेच त्यांनी राजन पाटलांवर हल्लाबोल करतानाच थेट महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांचा प्रचार केला होता.
मोहोळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे विजयी झाले. राजू खरे आपलाच उमेदवार होता. त्यांना आपणच निवडून आणल्याचे उमेश पाटील यांनी ट्विट करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला होता.'देवगिरी'वर पक्षप्रवेश केल्यानंतर उमेश पाटलांनी ट्विट केलं होतं.
त्यात त्यांनी 'माझा देवगिरी येथे सर्व मंत्री,आमदार व पार्थदादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्ष प्रवेश ही तांत्रिक बाब आहे.मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते...फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती..इतकच'असं म्हटलं होतं.
तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती. त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी मिळून 15 दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन (राजू खरे) विधानसभेला 30 हजार मताधिक्याने निवडून आणला.अजितदादांनी उमद्या मनाने स्वत:च्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचे कौतुक केले.
'विधानसभा निवडणुकीपूर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्यप्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता.परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. सोलापुर जिल्ह्यातील "मोहोळ विधानसभा" या राखीव मतदारसंघामधील मातब्बर प्रस्थापित नेत्या सोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळे मी नाईलाजाने पक्ष त्याग केला होता.', असे उमेश पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.