Sangli News : गेल्या तीने ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकळा झाला आहे. पुढच्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडी आता जोरात तयारीला लागली आहे. येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात स्थानिकच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिकसाठी दंड थोपटले असून सांगलीत पक्ष पातळीवर भाकरी फिरवलीय. नव तरूणांना संधी देण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासह तालुका निरीक्षकांच्या जिल्हा पातळीवर निवडी करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड यांच्यासह निरीक्षक अरुण आसबे, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनूरकर, शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, बी. के. नायकवाडी, महिला अध्यक्षा सुस्मिता जाधव, संजय पाटील यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा पातळीवर निवडी सोमवारी (ता.5) पार पडल्या. यावेळी जिल्हाध्यक्षपदी विवेक कोकरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, पक्ष निरीक्षक अरुण आसबे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत करण्यात आली. यावेळी तालुका निरीक्षकांच्याही निवडी करण्यात आल्या.
दरम्यान इस्लामपूरमध्ये ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ उपक्रम घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी, 'सध्या देशात धार्मिक ध्रुवीकरण केले जात आहे. सामान्य माणसांचे महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बाजूला पडत आहेत. कार्यकर्त्यांनी या परिस्थितीत अधिक सतर्क राहायला हवे,’ असे आवाहन केले. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी’ या उपक्रमासाठी इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये इस्लामपूर शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले होते.
जयंत पाटील म्हणाले, ‘पाकिस्तानमधून दहशतवादी येतात आणि देशातील निष्पाप लोकांचा बळी घेऊन परत जातात, हे सगळे संतापजनक आहे. एवढ्या मोठ्या पर्यटनस्थळी बंदोबस्त का नव्हता? या भ्याड हल्ल्याचा देशाने बदला घ्यायला हवा. देशातील जनता, विरोधी पक्ष सरकारसमवेत आहे. मग आज 10 ते 20 दिवस झाले, तरी प्रत्युत्तर का दिले नाही. सध्या देशात सामान्य माणसाची मुस्कटदाबी केली जात आहे. नेहा ठाकूर या सरकारला प्रश्न विचारणाऱ्या युवतीवर गुन्हा दाखल केला आहे. कार्यकर्त्यांनी विशेषतः युवकांनी देशात घडणाऱ्या घटना, प्रसंगांकडे लक्ष ठेवावे, त्याचे कशा पध्दतीने विश्लेषण येते, ते पाहावे. समाज माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांवर आपणही व्यक्त व्हायला हवे.
तालुका निरीक्षक म्हणून अमोल शिंदे (खानापूर), दिनकर पाटील (आटपाडी), मनोज शिंदे व चिमण डांगे (कवठेमहांकाळ), टी. व्ही. पाटील व राजू पाटील (मिरज), ताजुद्दीन तांबोळी (पलूस व कडेगाव), आनंदराव पाटील (शिराळा), संग्राम देशमुख (वाळवा), दत्ताजी पाटील (जत) यांच्या निवडी करण्यात आल्या. नूतन अध्यक्ष व निरीक्षकांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.