
Solapur, 11 January : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (स्व.) गणपतराव देशमुख यांच्यापासून ते त्यांच्यानंतर आजही आम्हा देशमुख कुटुंबाला वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केलेले आहे. तसेच, लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही माढ्यातील भाजप उमेदवाराच्या विरोधात केले होते. त्या सर्व गोष्टी विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी आणि सांगोल्याची आपुलकीने चौकशी केली. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. पण, विधीमंडळात काम करताना मी तटस्थ भूमिकेत राहणार आहे, अशा शब्दांत आपली राजकीय भूमिका सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केली.
डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांनी आमदार झाल्यानंतर प्रथमच ‘सकाळ’च्या सोलापूर कार्यालयास भेट दिली. त्या भेटीदरम्यान डॉ. देशमुख यांनी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. या चर्चेदरम्यान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल ही तटस्थ म्हणून राहील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
सांगोला (Sangola) विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मी विजयी झालो आहे, असे अनेकांना वाटत असेल. पण, वस्तुस्थिती तशी नाही. उलट तिरंगी लढतीमुळे माझे मताधिक्य कमी झाले आहे. सांगोल्यात दुरंगी लढत झाली असती तर शेकाप यापेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आला असता, कारण सांगोल्याच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती, असा दावाही देशमुखांनी केला.
मी तसा राजकारणापासून लांब होतो. मात्र, कोरोनाच्या काळात मला जनतेचे काम करण्याची संधी मिळाली. (स्व.) गणपतआबांच्या नंतर मला जनतेकडून प्रतिसाद मिळू लागला. मीही तेवढ्याच तडफेने जनतचे प्रश्न सोडवू लागलो. जनतेच्या सुख-दुःखात मी सहभागी होऊ लागलो, त्यामुळे सांगोल्याच्या जनतेबरोबरा माझे एक नाते तयार झाले, असेही डॉ. आमदार बाबासाहेबांनी स्पष्ट केले.
लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी आणि माझे बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी नवीन होती. त्या लोकसभा निवडणुकीने आम्हाला खूप काही शिकविले. त्या निवडणुकीत आलेल्या अनुभवानंतर आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आणि जनतेने आशीर्वाद दिल्याने मी विधानसभा निवडणुकीत यशस्वी झालो, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
सांगोल्याचा जनतेने ती सल पुसून काढली
सांगोल्याच्या जनतेने गणपतआबांवर आणि गणपतआबांनी जनतेवर वर्षेनुवर्षे निर्व्याज प्रेम केले. पण, गणपतआबा यांच्या हयातीमध्ये शेकापचा २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. ती सल सांगोल्यातील जनतेच्या मनात होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने ही सल पुसून काढली आहे, असेही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.