
Solapur, 31 March : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचा २५० एकर वन जमिनीच्या प्रश्नासंदर्भात येत्या १५ दिवसांच्या आतमध्ये कृषिमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि वन विभागाच्या मंत्र्यांची माझ्या दालनात बैठक लावण्यात येईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माझा फोन कॉल आणि काम सगळ्यांना चालतो, असा शब्द विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोलापूरकरांना दिला.
विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल प्रा. राम शिंदे यांचा धनगर समाजाच्या वतीने सोलापूरमध्ये सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारंभात बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे (Punyashlok Ahilyadevi Holkar University) कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांनी सोलापूर विद्यापीठालगतच्या २५० एकर वन जमिनीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना प्रा. शिंदे यांनी विद्यापीठाच्या जमिनीसंदर्भात पंधरा दिवसांच्या आतमध्ये बैठक लावण्याचा शब्द दिला.
सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, मी सकाळी एका ठिकाणी गेलो होतो, एक निवेदन नाही ना एक फोन करा, असं कोणी म्हटलं नाही. सांगायचं झालं तर माझ्याकडे खातं कोणतं आहे, हे माहिती नाही. कोणाला कामं सांगावं, तेही माहिती नाही. पण, माझा फोन कॉल आणि काम सगळ्यांना चालतं.
कुलगुरु महानवर यांनी सांगितलं ना की, सोलापूर विद्यापीठातील सुमारे २५० एकर जमीन वन विभागाची आहे. तेवढीच आपल्याकडे आहे. आता आपण प्रशासकीय इमारत बांधली आहे आणि पुतळा उभारला आहे, त्याठिकाणी आम्हाला जाता येत नाही, हे कुलगुरुंनी आपल्या भाषणातून सांगितलं.
आता मी काय कृषिमंत्री आहे का?, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहे का?, की वन विभागाचा मंत्री आहे. पण या तीनही विभागाच्या मंत्र्यांना माझ्या दालनात बोलावून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी आहे. ती बैठक माझ्या दालनात होईल आणि तीनही मंत्री माझ्या दालनात येतील, असे माझे पद आहे. एका एका मंत्र्याला भेटायचं म्हटलं तर तुमची टर्म संपून जाईल, त्यामुळे कुलगुरुंनी योग्य माणसाला योग्य काम सांगितलं आहे, असेही राम शिंदे यांनी नमूद केले.
काळजी करू नका. आगामी पंधरा दिवसांच्या आतमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कामासंदर्भातील बैठक माझ्या विधीमंडळाच्या कार्यालयात तीन मंत्री आणि आवश्यक त्या अधिकाऱ्यांसमवेत लावण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
चांगले काम करणे म्हणजे आपल्याला यश मिळेल, असे काही नसते. आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात. पण, आमदार देशमुख मी मंत्री नाही पण सभापती आहे. मी सगळ्या आमदारांचा सभापती आहे. मी माझ्या काळातला एकमेव मंत्री असेल की जो राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्री झालो. सोलापूर विद्यापीठाचे नामकरण अनेक वर्ष प्रलंबित होता. मात्र मी मंत्री झाल्यावर तो प्रश्न मार्गी लागला, असा दावाही शिंदे यांनी केला.
ते म्हणाले, औरंगाबादचे नाव बदलायला 60 वर्षे लागली. पण, अहमदनगरचे नाव आम्ही 16 महिन्यांत बदलले. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की तुम्ही औरंगाबाद आणि उस्मानाबाद चा प्रश्न मार्गी लावला. पण आमचे काय? आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच घोषणा केली की, अहमदनगरचे अहिल्यानगर नाव घोषित केले.
आज कोणी त्याला म्हणत असतील हे चुकीचे केले. पण, आमचा स्वाभिमान असलेल्या व्यक्तींचे नाव देणे हे योग्य आहे. मी संविधानिक पदावर असल्यामुळे मला बोलायला मर्यादा आहेत. मी माझ्या प्रीमायसेसचा हेड आहे, त्यामुळे माझं सर्वांना ऐकावंच लागतं. कॅमेऱ्यापुढे जास्त बोलणं योग्य नाही. आपल्याला दिलेली जबाबदारी छोटी किंवा मोठी हे महत्वाचे नाही तर आपण काम कसं करतो, हे महत्वाचे आहे. माझ्या पूर्वी 6-7 सभापती झाले पण ते सगळे वयस्कर होते. मी तरुण आहे, त्यामुळे मी जास्त फिरतो. कारण सभापतीपद हे मिरवायचेचं पद आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.