
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईचा इशारा दिला.
मात्र, राजू शेट्टी यांनी फडणवीस दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करत, कारखानदार भाजपमध्ये गेल्याने कारवाई होत नसल्याचे म्हटले.
शेट्टींनी सीना नदीच्या पुराला मानवनिर्मित ठरवत दोषी अधिकाऱ्यांवर चौकशीची मागणी केली.
Solapur, 05 October : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील सभेत बोलताना ‘काटा मारणारे साखर कारखाने मी शोधून काढले आहेत, त्यांना मी आता दाखवणार आहे’ असा इशारा दिला. मात्र, फडणवीसांच्या दुटप्पी भूमिकेवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे. ‘काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांची यादी कारवाईसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यासह दिली होती. पण तेच कारखानदार आज भाजप गेलेत, त्यामुळे त्यांनी कारवाईचे धाडस दाखवावे,’ असे प्रतिआव्हान दिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी परभणी, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ते म्हणाले, राज्यातील जे साखर कारखाने काटा मारतात, रिकव्हरी कमी दाखवतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यासह यादी दिली आहे. पण तेच साखर कारखानदार आज भाजपमध्ये गेले आहेत, त्यामुळे सरकारने शेतकरीहितासाठी सर्व कारखान्यांचे वजनकाटे, रिकव्हरी ऑनलाईन करण्याचे धाडस दाखवावे.
फडणवीस दिशाभूल करतात
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना २०२२ मध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राज्यभर दौरे केले होते. मात्र, तेच फडणवीस आता ओला दुष्काळ अशी संज्ञा नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सत्तेत असताना एक भूमिका आणि विरोधात असताना एक भूमिका घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करतात, असा आरोपही शेट्टी यांनी केला.
सीना नदीचा पूर मानवनिर्मितच
हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असतानाही जलसंपदा आणि महसूल विभागात समन्वय नसल्याने सीना नदीला पूर आला. समन्वय ठेवून माहिती घेतली असती तर सीना नदीला आलेला पूर नियंत्रित करता आला असता. सीना नदीचा पूर मानवनिर्मितच असून त्याला जे अधिकारी दोषी आहेत, त्यांची चौकशी करून कारवाई करावी. संबंधित अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई न केल्यास त्यांच्याविरोधात न्यायालयात जाणार आहे, असेही शेट्टी नमूद केले.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिर्डीत विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाच टनामागे देण्याची सूचना केली तर काही कारखान्यांनी त्याला विरोध केला. आता मी काटा मारणारे साखर कारखाने शोधून काढले आहेत. त्यांना मी दाखवणार आहे’ असा इशारा दिला आहे.
प्रश्न 1 : देवेंद्र फडणवीस यांनी काय इशारा दिला?
काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांना कारवाई दाखवण्याचा.
प्रश्न 2 : राजू शेट्टींचा आरोप काय आहे?
भाजपमध्ये गेलेल्या कारखानदारांवर फडणवीस कारवाई करत नाहीत.
प्रश्न 3 : शेट्टींनी कोणत्या आपत्तीचा उल्लेख केला?
सीना नदीच्या मानवनिर्मित पुराचा.
प्रश्न 4 : शेट्टी पुढे काय करणार आहेत?
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.