Political News: राज्य सरकारने राज्यातील ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना केली आहे. मात्र, या समितीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अजून काही शेतकरी नेत्यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे राजू शेट्टींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकरी नेते प्रयत्न करत होते. पण आता या समितीमधून शेतकरी नेत्यांनाच वगळण्यात आल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
ऊस दर नियंत्रण समिती नसल्यामुळे राजू शेट्टी यांनी आंदोलन करत समितीसाठी अनेकवेळा सरकारला इशारा दिला होता. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्षही वेधले होते. मात्र, ऊस दर नियंत्रण समितीमधून राजू शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटील यांनाही डच्चू देण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राजू शेट्टी नेमकी काय म्हणाले?
"ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी आम्ही सरकारकडे गेली एक वर्षं पाठपुरावा केला आहे. यासाठी अनेकवेळा आंदोलनं देखील केली. ऊस दर नियंत्रण समिती अस्तित्वात नसल्यामुळे एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याची क्षमता असूनही अनेक कारखान्यांकडून गेल्या वर्षातील अंतिम बिलं मिळालेली नाहीत".
"याचे कारण त्यांचा हिशोब करणारी ऊस दर नियंत्रण समिती अस्तित्वात नव्हती. पण आता कागदी घोडे नाचवून सरकारने दुबळी ऊस दर नियंत्रण समिती निर्माण केली. ज्या समितीमध्ये मी (राजू शेट्टी), रघुनाथ पाटील, विक्रमसिंह घाडगे यांच्यासारखे दिग्गज आम्ही काम करत होतो. पण आता दुबळ्या समितीची निर्मिती करत सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे", अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.