
Sangli News : मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतंर्गत स्वतंत्र बाजार समिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात नव्याने 65 बाजार समित्या होणार आहेत. ज्यामुळे राजकीय पक्षांसह नेते आणि शेतकऱ्यांमध्ये खळबळ घडाली आहे. याच निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातही तीन नव्या बाजार समित्यांची निर्मिती होणार असून यात जत, कवठेमहांकाळ आणि कडेगावचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयाला खासदार विशाल पाटील यांचा विरोध असून जत कवठेमहांकाळमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सध्या तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसत आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतंर्गत ज्या तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत तेथे त्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सांगलीच्या बाजार समितीच्या त्रिभाजणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून स्थानिकचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे येथे दोन गट पडल्याचे समोर आले आहे.
नव्या आदेशाप्रमाणे जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव येथे बाजार समित्यांची निर्मिती होणार असून याला सांगली, मिरज तालुक्यातील आमदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. तर भाजप आमदार गोपीचंद यांच्या मतदार संघातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. तर जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी या विरोधात तेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर विद्यमान संचालक मंडळाने देखील याला विरोध केला आहे.
सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत, जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सांगली बाजार समितीची स्थापना केली. यात दुष्काळी पट्ट्यातील मिरज, जत, कवठेमहांकाळचाही समावेश केला. याच बाजार समितीमुळे आज हळद आशिया खंडात पोहची असून लाखोंची उलाढाल होताना दिसत आहे. तर जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव भागातील राजकारण सोपं झालं आहे. पण आता महाआघाडीचे सरकार असताना मदन पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्रिभाजणाचे भूत बाजार समितीच्या मानगुठींवर बसले होते. जे न्यायालयीन लढ्यानंतर खाली उतरले होते.
यानंतर येथे मदन पाटील यांच्याविरोधात जयंत पाटील, पतंगराव कदम, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप यांनी मोठ बाधून पॅनेल तयार केलं आणि बाजी मारली होती. ही निवडणुक फक्त त्रिभाजणाच्या मुद्द्यामुळे गाजली होती. त्याचवेळी प्रतिक पाटलांचाही पराभव याच कारणामुळे होऊन संजयकाका खासदार झाले होते.
राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. आमदार गाडगीळ यांच्याकडे व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्री, पणनमंत्री यांची भेट घेतली होती. तर ज्या तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत तेथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. ती आता मान्य झाली असून जत, कवठेमहांकाळ आणि कडेगावला नव्या बाजार समित्या होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दरम्यान आता या विषयावरून खासदार विशाल पाटील यांनी विरोध दाखवला असून त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी हा निर्णय स्थानिकच्या राजकारणाकडे पाहून घेतला असावा. पण विरोध करातानाही त्यांनी, महायुती आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेटून निर्णय घेतला आहे. जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव येथे होणाऱ्या बाजार समितीच्या इमारतीवर सांगलीचे नियंत्रण आणि मालकी हवी. अशा नव्याने होणाऱ्या बाजार समित्यांमुळे नवी स्पर्धा तयार होईल. यामुळे सरकारला येथे पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, असे म्हटलं आहे.
एकीकडे या निर्णयाला काही ठिकाणी विरोध होत असताना जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींसह व्यापारी आणि शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पण आमदार सुरेश खाडेंच याला समर्थन आहे. पडळकरांचाही याला विरोध असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र त्यांनी याबाबत जनमताचा विचार करून आपण भूमिका घेऊ, याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी सावध भूमिका घेतली आहे. तर आपल्याच सरकारला कसा विरोध करायचा अशा द्विधा मनस्थितीत सध्या पडळकर दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.