सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून ४९ ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध, तर ११ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २४२ ग्रामपंचायतींत चुरशीच्या लढती होत असून प्रत्येक तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींत पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी लक्ष घातले आहे. आमदार-खासदारांनीही स्थानिक गटांना विविध माध्यमातून ताकद देण्यास सुरवात केली आहे. काही मोठ्या ग्रामपंचायतींच्या सभा, पदयात्रांत आमदार स्वत: उपस्थित राहणार असल्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतींत चुरशीच्या लढती होणार आहेत. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची नेत्यांकडून आतापासूनच तयारी सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचा एक, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन तर भाजपचे दोन आमदार आहेत. भाजपचे दोन व राष्ट्रवादीचा एक खासदार आहे. या सर्वांनी आपल्या मतदारसंघात आपल्या विचारांच्या गटाची सत्ता ग्रामपंचायतीवर कशी येईल ? यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच भाजप, बाळासाहेबांच्या शिवसेनेशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेस व उद्धव ठाकरे गट शिवसेनेची साथ मिळणार आहे. त्यादृष्टीने रणनीती आखली जात आहे. त्यामुळे या सर्व पक्षांच्या नेत्यांना ग्रामपंचायतींच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.
आपल्या पक्षाच्या विचारांची सत्ता ग्रामपंचायतीत येण्यासाठी आमदार व खासदारांच्या गटाने जय्यत तयारी केली आहे. सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ४९ ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध, तर ११ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. २४२ ग्रामपंचायतींत मतदान प्रक्रिया होणार आहे. सरपंचपदाच्या ७०२, तर सदस्यपदांसाठी २१९५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. २४२ ग्रामपंचायतींपैकी १०० ग्रामपंचायती मोठ्या असून त्यावर सर्व पक्षांच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्थानिक गटात चुरशीची लढत होणार आहे. पाटणमध्ये राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपल्या विचारांच्या गटांची सत्ता येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे पाटणकर गटही सक्रिय आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत.
भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात भाजपला मानणाऱ्या गटाची सत्ता आणण्यावर विशेष भर दिला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संदीप पोळ, दिलीप येळगावकर, सुरेंद्र गुदगे, प्रदीप विधाते, माजी आमदार प्रभाकर घार्गे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आदी प्रमुख नेत्यांनीही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. तर फलटणला राजे गट विरुद्ध खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्थानिक गटात ग्रामपंचायतींसाठी लढती होत आहेत.
वाई, महाबळेश्वर व खंडाळ्यातही स्थानिक नेत्यांच्या पातळीवर लढती होत आहेत. आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी स्थानिक गटातील नेत्यांना ताकद देत आपल्या विचारांच्या गटांची सत्ता जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साताऱ्यात मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक गटांतच लढती होत आहेत. पण, येथे जावळी व साताऱ्यात आमदार गटाचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे.
कऱ्हाड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले आहे. कऱ्हाड दक्षिणेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा स्थानिक गट, ॲड. उदयसिंह पाटील, भाजपचे नेते अतुल भोसले यांनी आपल्या विचारांची सत्ता जास्तीत जास्त ग्रामपंचातींत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या विचारांची सत्ता आणण्यासाठी नेते मंडळी सक्रिय झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. सरपंचपदाच्या ३१९ जागांसाठी १४२६, तर सदस्यपदांच्या २६५५ जागांसाठी ६९०४ उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी सरपंचपदाच्या शर्यतीतून ७०२ उमेदवारांनी माघार घेतली तर सदस्यपदांच्या २१९५ उमेदवारांनी माघार घेतली. सरपंचपदाच्या शर्यतीत २४२ जागांसाठी ६५५ उमेदवार, तर सदस्यांच्या १८१२ जागांसाठी ३८९७ उमेदवार रिंगणात आहेत.
अर्ज मागे घेतलेल्या दिवशी जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायती पूर्णत: तर ११ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष २४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या अशी आहे. सातारा १०, कऱ्हाड सात, पाटण ११, कोरेगाव सात, महाबळेश्वर तीन, जावळी तीन, फलटण चार, माण दोन, खटाव दोन, तर अंशत: बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये कऱ्हाड चार, पाटण चार, कोरेगाव एक, जावळी एक, खटाव एक.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.