लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर, राजू शेट्टी आणि शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत धैर्यशील माने यांचं विजय झाला आहे.
पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी महाविकास आघाडीनं विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. यावर काँग्रेस नेते, सतेज पाटील यांनी भाष्य केलं आहे. मी शेवटपर्यंत शेट्टी सोबत राहण्यासाठी प्रयत्न केल्याचं पाटील यांनी सांगितलं.
राजू शेट्टी काय म्हणाले होते?
"महाविकास आघाडीनं खरेतर निवडून आल्यानंतर काय काम करणार याचा ड्राफ्ट तयार केला होता. तो ड्राफ्ट जयंत पाटील ( Jayant Patil ) आणि बंटी पाटील यांनी तयार केला होता. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला. त्यापूर्वी सहा महिन्यांपासून ही जागा सोडली जाणार, असं सांगण्यात येत होतं. मी उमेदवार असल्यानं सर्वांना भेटावे, असं त्यांना वाटत होते. मी सगळ्यांना भेटलोही. पण, या नेत्यांनी शेवटी करायचे तेच केले," असा आरोप शेट्टींनी केला होता.
यावर सतेज पाटील ( Satej Patil ) म्हणाले, "राजू शेट्टी आमच्यासोबत यावेत, म्हणून मी पहिल्यापासून प्रयत्न करत होतो. मात्र, त्यांना फक्त शिवसेनेचा पाठिंबा होता. बाकीच्या पक्षांबद्दल ते बोलत नव्हते. शेट्टी यांची कोणतीही फसवणूक झालेली नाही. ते शेवटपर्यंत सोबत राहण्यासाठी मी प्रयत्न केले."
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते, विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्यात रणकंदन सुरू आहे. यावर बोलताना सतेज पाटलांनी म्हटलं, "सांगलीत जयंत पाटील आणि काँग्रेस नेत्यांत काही गैरसमज आहेत. ते लवकरच दूर होतील."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.