
Solapur News : महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशनातील आरोप-प्रत्यारोपांची धग अजूनही कायम आहे. याचदरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा लवकरच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
माळशिरस येथे होलार समाजाचा सोमवारी (ता.4 ऑगस्ट) मेळावा होता. या मेळाव्यात बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठं विधान केलं आहे. यावेळी जानकरांनी कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब, असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
उत्तम जानकर यांनी राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखा माणूस मी कधीही पाहिला नाही. मी 30 वर्षांपासून राजकारणात वावरतो, दुसऱ्या पक्षात आहे, मात्र असा माणूस पाहिला नाही असं म्हणत त्यांनी कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब असल्याचं जानकर यांनी सांगितलं.
यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी होलार समाजाच्या महामंडळासाठी 100 कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केल्याचा उल्लेखही केला. तसेच गरीब समाजाला न्याय मिळावा यासाठी हा मेळावा आहे, गावात घरकुलसाठी होलार समाजाला जागा मिळावी, माळशिरससाठी 100 मुलं आणि मुलींसाठी वसतिगृह मंजूर आहे, मात्र त्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी आहे. असं जानकर यांनी नमूद केलं.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यावरुन टोमणा मारला. ते म्हणाले,‘राम सातपुते, तुमच्या विरुद्ध निवडून आलेला आमदार सभागृहात आल्यावर सारखं म्हणायचा, ‘राजीनामा देतो, राजीनामा देतो.’ मी म्हणायचो, ‘कधी देतो, कळतच नाही. नवीन निवडून आलेला माणूस लयं फडफड करत असल्याचं सांगितलं.
माळशिरसमध्ये असलेल्या शिरसाट यांनी उत्तम जानकर यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरत गावात पहिल्यांदा सरपंच झालेला माणूस म्हणत असतो की, ‘मीच मुख्यमंत्री आहे.’ त्या भावनेतून तो वागायला लागला की, तो काहीच दिवस राहतो आणि नंतर घरी बसतो. जनताच त्याला घरी पाठवत असते,असा चिमटा काढला.
आमचं कोणीही राजकारणात नव्हतं. जनतेच्या प्रेमामुळे आम्ही गेली 42 वर्षे आम्ही टिकून आहोत. मी दहा वर्षे नगरसेवक आणि वीस वर्षे आमदार आहे. भरतशेठ गोगावलेसुद्धा चारवेळा आमदार आहेत. जिल्हा परिषद त्यांनीही काढलेली आहे. पण, आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतो. ते जेव्हा आपल्या व्यथा सांगतात, तेव्हा आपल्याला खरी परिस्थिती कळते,असंही शिरसाट यांनी सांगितलं.
शिरसाट आपल्या भाषणात म्हणाले, राजकारणात जेव्हा पाय टाकतो, तेव्हा त्या पद्धतीनेच राहिले पाहिजे. मी त्यांच्यावर (उत्तम जानकर) टीका करणार नाही, कारण त्यांच्या स्वभावात ते नाही. काहींचा मी म्हणजेच सर्वकाही, असा अविर्भाव असतो. मी म्हणजे सर्वकाही नसतं. जनतेमुळे आपल्याला खुर्च्या मिळालेल्या आहेत, ते कधी विसरता कामा नये. तोच माणूस मोठा होत असतो, असेही शिरसाट यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.