Satara Politics News : 'लोकसभेच्या निवडणुकीत थोडक्यात झालेल्या पराभवाने मी खचणार नाही, कोणाला वाटत असेल शशिकांत शिंदे संपले, पण मी संपणारा नाही. आता संपूर्ण जिल्हाभर संघटन बांधणी करून महाविकास आघाडी मजबूत करण्यावर भर देणार आहे.', असे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
ल्हासुर्णे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) बोलत होते. ते म्हणाले, "येत्या दोन-चार महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण निर्माण होईल.
दरम्यान मी लोकसभेला निवडून आलो असतो, तर जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारांना मी ताकद देईन, असे काही लोकांना वाटले असेल आणि त्यामुळे देखील माझा लोकसभेत पराभव केला असेल. मागच्या वेळी लोकसभेला श्रीनिवास पाटील उमेदवार होते. त्यावेळी विधानसभेचीही निवडणूक झाली होती. त्यावेळी पक्षाचे सर्व आमदार नेते राष्ट्रवादीसोबत एकसंधतेने होते.
'मात्र, यावेळी कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव सोडले, तर उर्वरित मतदारसंघांमध्ये कुठेही पहिल्या फळीतील नेते, आमदार सोबत नव्हते. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. यावेळी राज्यात बदलाचे वारे निर्माण झाले होते. लोकांमध्ये केंद्र व राज्य सरकारविषयी तीव्र नाराजी होती. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसह जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. वाई मतदारसंघात मला मताधिक्य मिळाले.'
तसेच 'कोरेगावमध्ये कमी मते मिळाली. या मतदारसंघातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे एकत्रित प्राबल्य असलेल्या भागातील काही गावांमध्ये, विशेषतः जमिनीवर शिक्के असलेल्या काही गावांमध्ये ही परिस्थिती राहिली.' असं शिंदेंनी सांगितलं.
याशिवाय 'पालकमंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांच्या पाटणमध्ये सत्यजित पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे तिथे आघाडी मिळाली. साताऱ्यामध्ये समोरच्यांचे मताधिक्य घटले ते ३६ हजारांवर आले. जावळीतून मला सात ते आठ हजारांची मताधिक्य मिळाले. त्यामुळे साताऱ्याचे मताधिक्य घटले.'
'तेथे बळाचा व अमिषाचा वापर केला गेला. काही प्रमाणात बोगस मतदान झाल्याच्याही चर्चा आहेत. कराड उत्तर व कराड दक्षिणमध्ये मताधिक्याची अपेक्षा होती; परंतु अनपेक्षितपणे तेथे मताधिक्य मिळाले नाही. विरोधकांनी या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले होते. त्याचा मला फटका बसला.' असंही शिंदे यांनी बोलून दाखवलं.
याशिवाय 'अन्य एका उमेदवाराचे चिन्ह व आमचे चिन्ह यामधील साम्यता व त्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमामुळे तिकडे वळालेल्या मतांपैकी काही मते सोडली, तर बहुतेक मते आमच्या चिन्हाची होती. असाच मतविभागणीचा प्रकार बीड, माढा या मतदारसंघातही झाला आहे. हे सर्व लक्षात घेता लोकांनी दाखवलेल्या पाठबळातून सातारा जिल्हा आजही शरद पवार यांच्याच विचारांचा आहे, हे मतदारांनी दाखवून दिले आहे. समोरच्या बाजूने सर्व यंत्रणा, शक्ती वापरली गेली. ' असही शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.
'तरीही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या जिल्ह्यातील जनतेने लढाईसाठी साथ दिली, ती मी विसरू शकत नाही. त्याबद्दल मतदारांचे आभार मानतो. या निवडणुकीत साडेपाच लाख मतदारांचे मिळालेले प्रेम ही माझी चढती कमान आहे. यापुढेही यशवंतराव चव्हाण व शरद पवार(Sharad Pawar) यांच्या विचारांचा हा जिल्हा उभा करण्यासाठी एक सैनिक म्हणून मी काम करेन. विशेषतः प्रामाणिकपणे काम केलेल्या काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना राजकीय, सामाजिक ताकद देण्याचा प्रयत्न करून आघाडी धर्माची जपणूक करणार आहे.' असे शिंदे यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.