Solapur Shivsea : आतापर्यंत सात आमदार देणाऱ्या सोलापूरच्या शिवसेनेला ‘धोनी’सारख्या कॅप्टनची गरज
प्रभूलिंग वारशेट्टी
Solapur, 19 June : तब्बल 29 वर्षांच्या संघर्षातून शिवसेनेला मंत्रालयावर भगवा फडकावता आला. सोलापूर जिल्ह्याला उत्तमप्रकाश खंदारे यांच्या रुपाने लाल दिवा मिळाला होता. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याने शिवसेनेला सात आमदार दिले आहेत. मात्र, साठीच्या उंबरठ्यावर असतानाच शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले. संपूर्ण जिल्ह्यावर मांड ठोकणारा एकही नेता शिवसेना उभा करू शकलेली नाही हे वास्तव आहे. विशेष म्हणजे दोन्ही शिवसेनेकडे संपूर्ण जिल्ह्याची सूत्रे हाती सांभाळू शकलेला एकही नेता नाही. आता दोन्ही शिवसेनेकडे मिळून सोलापूर जिल्ह्यात फक्त एकच आमदार आहे, त्यामुळे दोन्ही शिवसेनेला सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या कल्पक नेतृत्व असलेल्या महेंद्रसिंह धोनीसारख्या धडाकेबाज कामगिरी करून दाखविणाऱ्या कॅप्टनची गरज आहे.
एकत्रित शिवसेनेकडून (Shivsena) आतापर्यंत उत्तमप्रकाश खंदारे, शिवशरण पाटील बिराजदार, दिलीप सोपल, राजेंद्र राऊत, रतिकांत पाटील, नारायण पाटील, शहाजी पाटील हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. लोकसभेची जागा मित्रपक्ष भाजपकडे असल्याने आतापर्यंत शिवसेनेला खासदारकीला नशीब अजमावता आलेले नाही. विशेष म्हणजे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या सुभेदारीच्या पलिकडे पक्षसंघटना वाढीच्या दृष्टीने कधी पाहिलेच नाही.
राज्यात १९९५ नंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या रुपाने दुसऱ्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. पण, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जाऊन मुख्यमंत्री झाले. त्या महाविकास आघाडीत अडीच वर्षांची सत्ता भोगल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फूट पडली. तशी ती सोलापूर जिल्ह्यात पडली. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शहाजी पाटील आणि भूम परांड्यातून निवडून आलेले तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.
एकसंघ शिवसेनेची दोन गटांत विभागणी झाली. सोलापूर शहरातील अनेक जुने नेते उद्धव ठाकरेंसोबत राहिले. पण, जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. मातोश्रीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने अखेर माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील, अमर पाटील यांनीही ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाणे पसंत केले.
एकत्र शिवसेना असताना बळ देऊनही सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना आपला मतदारसंघ बांधता आला नाही. याउलट युतीत मित्र असलेल्या भाजपने हळूहळू सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आपले राजकीय बस्तान पद्धतशीरपणे बसविले आहे. पण, शिवसेनेतील वरिष्ठांना जिल्ह्यात पक्ष वाढवता आलेला नाही, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.
(स्व.) महेश कोठे यांच्या रूपाने शहरात शिवसेनेला तगडा नेता मिळाला होता. मात्र गटबाजीत त्यांच्यावरही पक्ष सोडून जाण्याची वेळ आणली गेली. त्यांना पक्षात ना सन्मान मिळाला, ना पक्षश्रेष्ठीकडून ताकद. त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. पण त्यांना ताकद देऊन शिवसेना वाढवावी, असे पक्षनेत्यांनाही वाटले नाही.
सत्तेमुळे शिंदेसेनेकडे सिद्धाराम म्हेत्रे, अमर पाटील, भगीरथ भालके, सचिन चव्हाण, काका साठे यांच्यासारखे इतर पक्षातील अनेक नेते येत आहेत. त्यातून शिंदेसेनेची ताकद जिल्ह्यात निश्चितच वाढत आहे. परंतु या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा एकही नेता दोन्ही शिवसेनेकडे नाही. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगमी निवडणुकांमध्ये बसू शकतो.
दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर निष्ठावंतांना मानसन्मान देत, तरुणांना पदाची संधी देऊन पक्ष वाढविण्याचे आव्हान असणार आहे. मात्र, सत्ता नसल्याने कार्यकर्ते टिकवून ठेवण्याचे चॅलेंजही त्यांच्यापुढे असणार आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सोलापुरातील सहकारी यशस्वी होतात का हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.