

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थक भाजप नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी केला. त्यांनी स्पष्ट केले की डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात निंबाळकर यांचा दुरान्वयेही संबंध नाही.
साळुंखे-पाटील यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख यांच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटलं की, हे प्रकरण चुकीच्या दिशेने नेऊन विकासकामांवर अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
साळुंखे-पाटील यांनी मेहबूब शेख ऊसतोड मुकादमांची दलाली करत असल्याचा आरोप करताना सांगितले की, ऊसतोड मजुरांना दिलेल्या उचलीच्या कर्जाची परतफेड न झाल्यास कारखान्यांना वाहनं अडवावी लागतात आणि स्वराज कारखाना त्याला अपवाद नाही.
Satara, 31 October : फलटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा दुरान्वये संबंध नाही. तरीही त्यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख हे आरोप करून त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. त्याच्या पाठीमागे रामराजे नाईक-निंबाळकर यांचा हात असून, आगवणे आणि ननावरे प्रकरण बाहेर काढून शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, असा दावा भाजपचे नेते तथा रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे समर्थक प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी केला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फलटण तालुक्यातील सुरवडी येथे पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्या पत्रकार परिषदेत साळुंखे पाटील बोलत होते.
साळुंखे-पाटील म्हणाले, फलटणमधील डॉक्टर युवतीच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. यात जे दोषी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. पीडितेला व कुटुंबातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र, हे प्रकरण भरकटवले जात असून, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना गोवण्यासाठी तसेच बदनाम करण्यासाठी शिवसेनेच्या सुषमा अंधारे, मेहबूब शेख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे गलिच्छ राजकारण सुरू आहे.
फलटण तालुक्यात सध्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. ही विकासाची घोडदौड रोखण्यासाठी खालच्या दर्जाचे राजकारण केले जात आहे. सुषमा अंधारे चुकीच्या माहितीवर आरोप करत आहेत, असा दावाही साळुंखे पाटील यांनी केला.
साळुंखे पाटील म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक मुकादम लाखो रुपयांच्या उचली घेऊन अनेक कारखान्यांना फसवतात. तो मुकादम येतो, प्रत्येकाकडून ५० टोळीसाठी पैसे घेऊन जातो व कारखाना सुरू झाला, की एका कारखान्याला फक्त पाच-पाच टोळ्या द्यायचा अन् फसविण्याचे उद्योग करतात.
ऊसतोड मजुरांच्या मुकादमांना पैसे देण्यासाठी संबंधित कारखाने १२-१३ टक्क्यांनी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन त्यांना उचली दिल्या जात असल्याने त्याची परतफेड झाली नाही, तर त्यांची वाहने अडवावी लागतात. त्यामुळे कारखानदारांकडून त्यांची वाहने ठेवली जातात. त्यास स्वराज कारखानाही अपवाद नाही. मेहबूब शेख हे ऊस तोडणी मुकादमांची दलाली करत असल्याची टीका साळुंखे-पाटील यांनी केली.
“डॉक्टर युवतीच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे; दोषींना कठोर शिक्षा व्हावी.”
“शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वापर करून रणजितसिंह निंबाळकर यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
“फलटणमधील विकासकामांना रोखण्यासाठी खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.