
Sangli, 06 June : सांगली जिल्ह्यातील तीन माजी आमदारांसह मातब्बर नेत्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यातील बहुतांश नेते हे महायुतीशी संबंधित होते तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणारे होते, त्यामुळे पाटील यांनी हे प्रवेश रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या माध्यमातून त्या नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते. मात्र, जयंतरावांचा निरोप धुडकावून लावत तीन माजी आमदारांसह मातब्बर नेत्यांनी घड्याळाचा रस्ता धरला हे आता उघड झाले आहे.
शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख या 3माजी आमदारांसह, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवि पाटील, स्थानिक नेते योगेश येसुगडे यांंनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे सर्व लोक एकेकाळी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. मात्र, कालांतराने या नेत्यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आता या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने जयंतराव पाटील यांना धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यात पक्ष बांधणी करण्याचा जोरदार प्रयत्न चालवले आहेत. इतरत्र त्यांच्या पक्षाकडे एखादा-दुसरा नेता हाती लागला होता. मात्र, सांगली जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बडा नेता नव्हता. पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्हा असल्याने कोणीही पक्ष सोडण्याचे धाडस करत नव्हते.
मात्र, भाजपत अस्वस्थ असलेल्या नेत्यांनी डाव साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी पडद्याआडून सुत्रे हलविल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक काही बडे नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे माहिती आहे.
दरम्यान, जतमधील एका कार्यक्रमात विलासराव जगताप यांनी आमदार जयंत पाटील यांना आवाहन केले होते. भाजपविरोधात एकजूट करा आणि पुन्हा एकदा जिल्ह्याचे नेतृत्व होती घ्यावे, असे जाहीरपणे सांगितले होते. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी एकसंघपणे जिल्ह्यात काम करावं, असा प्रस्तावही दिला होता. मात्र, त्याकडे जयंतराव पाटलांकडून साफ दुर्लक्ष करण्यात आले. ते पाहून या नेत्यांनी घड्याळ हाती बांधले.
जयंत पाटील यांच्याकडून कोणतेही संकेत मिळत नसल्याचे लक्षात येताच माजी आमदार विलासराव जगताप यांनी एक घाव दोन तुकडे करत थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतला. 'दुष्काळ फोरम'मधील एकेकाळचे त्यांचे सहकारी राजेंद्र देशमुख, अजितराव घोरपडे यांनाही घेतले होते. माजी आमदार घोरपडे यांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. पण या हालचाली आणि गाठीभेटी सुरू आहेत.
मात्र या गोष्टी लक्षात येताच जयंतरावांनी नाराज नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या माध्यमातून त्या नेत्यांशी संपर्क साधला होता. जिल्ह्यात नव्याने बांधणी करावी आणि जयंतरावांच्या नेतृत्वात पुढे जावे, असा प्रस्ताव होता. मात्र, या नेत्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकिट नाकारल्यानंतर सांगली मतदारसंघातून बंडखोरी करणाऱ्या जयश्री पाटील यांना पक्षातून निलंबित केले होते. त्याही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. मात्र, येत्या आठवडाभरात त्या निर्णय घेण्याची शक्यता आहे. मदनभाऊ समर्थकांचा सत्तेत जाण्याचा जयश्री पाटलांकडे आग्रह होत आहे.
काहींचे म्हणणे थेट भाजपमध्ये जाण्याचे आहे. याबाबतची कुणकुण लागताच जयंतराव पाटील यांनी जयश्री पाटील यांच्याशी संपर्क साधून चर्चा केल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या पक्षाचे प्रमुख नेतेही जयश्रीताईंच्या संपर्कात आहेत, त्यामुळे जयश्री पाटील कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.