

Prakash Ambedkar News : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात S.I.R. सर्वेक्षणाखाली तब्बल २ कोटी ९० लाख मतदार कमी होणार आहेत. जर इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली गेली, तर त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांच्या निकालांवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी दावा केला की, ज्या 2 कोटी 90 लाख मतदारांची नावे कापली जाणार आहेत त्यातील एकनाथ शिंदेंच्या प्रत्येक खासदारांच्या मतदारसंघातील अडीच लाख, तर आमदाराच्या मतदारसंघातील 30 हजार नावे कापली जाणार आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी केवळ निवडणूक आयोगावरच नव्हे, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले आहे. निवडणूक आयोगाचा हा तथाकथित 'फ्रॉड' पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी राहुल गांधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पीडित मतदारांच्या भेटी घ्यायला हव्या होत्या, असे त्यांनी सुचवले आहे.
केवळ आरोप करण्यापेक्षा पुराव्यांसह मेळावे घेऊन हा विषय लावून धरला असता, तर आयोगाचा खोटरडापणा जगासमोर आला असता, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
पुनरिक्षण ही प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, दुबार नावे काढण्यासाठी किंवा मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी राबवली जाते. मात्र, विरोधी पक्षांकडून वारंवार असा आरोप केला जात आहे की, या प्रक्रियेचा वापर करून विशिष्ट विचारसरणीच्या किंवा समुदायांच्या मतदारांची नावे यादीतून जाणीवपूर्वक कमी केली जात आहेत.