

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे.
२० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले.
राज ठाकरेंनी युतीचे स्पष्टीकरण देत भाजपवर जोरदार टीका केली.
Mumbai News : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता प्रचाराला देखील वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह इतर काही महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. यावेळी आज रविवार (ता.11) मुंबईमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र येण्यावर राज ठाकरे पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले.
दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आज आमचे आई-वडील आजोबा हजर हवे होते. पुन्हा एकदा मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी उभारलेला लढा इथे नसले तरी ते वरून पाहत असतील, असे भावनिक वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी २० वर्षांनी पहिल्यांदा युती करतोय, त्यामुळे प्रक्रियेत अनेक लोकांना तिकीटं दिली गेली अनेकांना देता आली नाही, अनेक जण नाराज झाले. काहींना दुसऱ्या पक्षात जावं वाटलं. काही गोष्टी झाल्या, होतात, काही आमच्या पण हातात नसतं. त्यांना दुखावणं हा आमचा हेतू नव्हता. पण तरीही नाराजांची दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी, गेलेले लोक आपलेच असून ते परत येतील असाही आशावाद व्यक्त केला आहे. तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आहेत तेच कुठे जातील सांगता येत नाही, असाही टोला लगावला आहे. मी आणि उद्धव एकत्र येण्याचं कारण मुंबईवर आलेलं संकट असून गेली अनेक वर्षे भाषणातून हे मुद्दे आपण मांडत आलो आहोत. राज्यात कशा प्रकारचा डाव रचला जातोय. मध्यंतरी हिंदी सक्तीचा विषय राज्य सरकारने आणला. त्यावेळी उद्धव आणि मी कडाडलो. कुठच्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी सांगितलं होतं. तिकडून युतीच्या चर्चेला सुरुवात झाली. पण हिंदी सक्तीचा विषय होता तो तुम्हाला चाचपडून पाहण्याचा होता. तुम्ही जागे आहात का ते पाहायचं होतं, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आता २०२४ या वर्षानंतर विधानसभा निवडणुकीनंतर सरकारला जे मनाला येईल ते करायला सुरुवात झाली. कुठून आली इतकी हिंमत? कोणाला विचारायचं नाही, लोकं बिकं नावाची गोष्ट नाही, आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. कोण आहे ही महाराष्ट्राची जनता, पैसे फेकले की विकत घेऊ हा आत्मविश्वास कुठून आला यांच्यात. काँग्रेसही सत्तेत होती, अनेक लोक सत्तेत होते, पण ते लोकांना घाबरून असायचे. जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं वगैरे काहीच नाही. गृहीत धरून टाकलं आहे जनतेला. मतं कुठून येतात, कशी येतात याविरोधात लढा सुरूच आहे. उद्दामपणा कुठेपर्यंत गेला तर अकोटमध्ये एमआयएमसोबत आणि बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेससोबत युती केलीय. ६६ जागा बिनविरोध आल्या. आज ६६ आहेत, उद्या आकडे वाढत जातील. त्यांना कळलंय की आपण लोकांना कसं विकत घेतोय.
वाईट हे वाटतं की आपण विकले जातोय. ड्रग्ज विकणाऱ्याला भाजपनं तिकीट दिलंय. तुमच्या नाकावर टिच्चून ही तिकिटं दिली जातायत. बलात्काराच्या गुन्ह्यातला आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत आली कुठून असाही सवाल राज ठाकरेंनी केला आहे. तर वेड्या वाकड्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचं यंत्र-तंत्र हस्तगत होतं तेव्हाच ही मस्ती, माज येतो. अख्खी मुंबई, महाराष्ट्र, देश विकायला काढलाय. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही येत नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
स्वकियांचा घात करणारी औलाद फक्त पक्ष्यांमध्ये नसते तर राजकीय पक्षांमध्येही आलीय. सत्ता डोक्यात गेलीय. भूगोल नीट समजून घ्या असे म्हणत राज ठाकरे यांनी वाढवण बंदर का डेव्हलट केलं जातंय याचे कारणही सांगितले. त्यांनी या बंदराला लागून गुजरात आहे. मुंबई गुजरातला न्यायची असेल तर पालघर, ठाणे जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल. मतदारसंघ फोडा, माणसं फोडा आणि मतदारसंघ ताब्यात घ्या. खासदार, आमदार, नगरसेवक आमचाच, महापालिकाही आमच्याच हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल यासाठीचा हा खेळ सुरू असल्याचा घणाघातही यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
आमच्याकडे जातीपातीत भांडणं लावतायत, एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करून टाकतील. मुंबई तुमची ताकद आहे. आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू हा मस्तवालपणा यांच्या अंगात आता शिरलाय. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकलं आणि आता मांडीला मांडी लावून बसले. अजित पवारांचे बैलगाडीभरून पुरावे नेले, आता काय सांगतायत कोर्टात केस आहे. पुरावे असतील द्या आणि करा अटक. तुम्ही पुरावे दिले होते ना मग द्या ते कोर्टात, असा हल्लाबोल केला आहे.
तर भाजपला त्यांनी टोला लगावताना त्यांनी, बाहेरून माणसं आणून तुमचा टक्का कमी करायचा डाव त्यांचा असून त्यांना आता युपीतून आलेली माणसं आतली वाटतात. पण कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याहून येणारे बाहेरचे वाटतात. ते येथे चालत नाहीत. उलट उत्तर भारतीय महापौर करू असं म्हणायची हिंमत यांचे होते. ती होतेच कशी होते, आपण बोलू शकतो का तिथे जाऊन असाही सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. तर असे बोलणाऱ्या आणि त्यंचा ताकद देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दोघे बंधू एकत्र आल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
1. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती का झाली आहे?
महापालिका निवडणुकांसाठी, विशेषतः मुंबई महापालिकेसाठी.
2. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वर्षांनंतर एकत्र आले?
तब्बल २० वर्षांनंतर.
3. राज ठाकरेंनी भाजपवर काय आरोप केला?
भाजपने मुंबई ‘विकायला काढली’ असल्याची टीका केली.
4. ही सभा कुठे झाली?
मुंबईमध्ये.
5. या युतीचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
मुंबईसह इतर महापालिकांमध्ये राजकीय समीकरणे बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.