

shaktipeeth Highway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यानुसार, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मार्गात सुधारणा करण्यात आली आहे. तर सातारा जिल्ह्याचा नवीन समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे शक्तीपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाला आहे.
फेब्रुवारी 2024 मधील शासन निर्णयानुसार, 12 जिल्ह्यांत 802 किलोमीटरचा महामार्ग प्रस्तावित होता. पण अनेक शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास तीव्र विरोध झाला. या महामार्गामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा व पंचगंगा नदीकाठचा मोठ्या प्रमाणात बागायती जमिनीचा पट्टा बाधित होत असल्याने दोन्ही जिल्ह्यात आंदोलन उभे राहिले. अशात विधानसभा निवडणुकीमध्ये या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी महामार्गाचा प्रस्ताव मागे पडला.
पण निवडणूक संपताच पुन्हा महामार्गाच्या हालचाली सुरु झाल्या. शिवाय शेतकरी विरोधामुळे नव्याने आखणी करण्यात आली, त्यानुसार सातारा जिल्ह्याचा नव्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. आता हा महामार्ग सातारा, सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर आणि चंदगडमार्गे पुन्हा दोडामार्ग तालुक्यात बांद्याजवळून गोव्यात प्रवेश करणार आहे.
या सुधारित आखणीस मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील मार्ग जैसे थे ठेवण्यात आला आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मार्गात सुधारणा करण्यात आली आहे. शिवाय सातारा जिल्ह्याचा नवीन समावेश करण्यात आला आहे.
शक्तिपीठ महामार्ग पूर्वी धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यात प्रवेश करत होता. त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील मोजक्या गावांमधून मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करत होता. आता पूर्वीच्या बाधित तालुक्यांपैकी उत्तर सोलापूर आणि सांगोला वगळले असल्याची माहिती आहे. नवीन बाधित तालुक्यांमध्ये माढा आणि माळशिरस तालुक्यांचा समावेश झाला आहे. बार्शीतील अंशत: तर मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील बाधित गावांमध्ये बदल झाला आहे.
सातारा जिल्ह्याचा समावेश :
सोलापूर जिल्ह्यातून गारवडमधून हा मार्ग साताऱ्यातील कारखेलमध्ये येणार असल्याची माहिती आहे. तेथून पर्यंती, दिवड, कुकुडवाडवरून खटावमधील पडळनंतर मायणीजवळून सांगली जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गामुळे माणमधील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन तीर्थक्षेत्रेही जोडली जाणार आहेत. नव्या आखणीनुसार 856 किलोमीटर लांबीचा सुधारित मार्ग अंतिम करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.