Pune News : भाजप नेते व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मस्जिदीबाबत मोठा खुलासा केला होता. यावेळी त्यांनी बाबरी पाडण्याच्या घटनेशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. तिथं ना शिवसैनिक होते, ना बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेबांनी केवळ जबाबदारी घेतली होती, पण एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता असं विधान केलं होते.
यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उध्दव ठाकरेंसह संजय राऊतांनीही पाटील आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. याचवेळी चंद्रकांत पाटलां(Chandrakant Patil) नी मी बाळासाहेबांचा कधीही अनादर केला नाही तसेच बाबरी पाडताना संजय राऊत कुठे होते असा सवालही उपस्थित केला.
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या बाबरी मस्जिद प्रकरणावर केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पाटील म्हणाले, माझ्या मनात बाळासाहेब आणि मातोश्रीविषयी माझ्या मनात आदर,श्रध्दा आहे. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत बाळासाहेबांमुळेंच मुंबईतील हिंदू जिंवत राहिला असंही पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी बाबरीबाबतचं आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली १९८३ पासून सुरु झालं आहे. माझ्या त्या मुलाखतीतही मी स्पष्ट बोललो होतो की, बाबरी पाडताना सर्व हिंदू होते.बाबरी पाडताना शिवसैनिक होते. पण सर्व हिंदू म्हणून तिथे आले होते असा खुलासाही पाटील यांनी यावेळी केला.
तसेच मी कधीही बाळासाहेबांचा अवमान केला नाही. बाळासाहेबांविषयी माझ्या मनात कालही आदर होता , आजही आहे आणि उद्याही राहील. माझा आक्षेप हा बाबरी पाडताना शिवसेना होती यावर आहे. विश्व हिंदू परिषद व संघाच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिद पाडली.पण बाबरी पाडली तेव्हा संजय राऊत कुठे होते असा सवालही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास नेहमी केला जातोय. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांचा अनादर केला हा आरोप मी कधीही सहन करणार नाही. शिंदेंनी फोन करुन मला पत्रकार परिषद घेण्यास सांगितलं.
तसेच याशिवाय माझे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले होते. उद्धवजी ठाकरे यांच्या सोबतही माझे खूप चांगले संबंध आहेत मी त्यांना फोन करून याबाबत विचारणार आहे. उद्धवजी माझ्या मनात कधीही बाळासाहेबांच्या बद्दल अवमान होईल असं येऊ शकत नाही तरी तुम्ही माझ्याबद्दल असं काय म्हणू शकतात असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर टिप्पणी करणार नाही असंही पाटील म्हणाले.
उध्दव ठाकरे काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य़ करताना माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, चंदकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा एकनाथ शिंदे तुम्ही राजीनामा द्या अशी मागणीठाकरे यांनी केली आहे. तसेच बाळासाहेबांचा एवढा अपमान कधी झाला नव्हता. त्यामुळे वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच बाळासाहेबांचं महत्व कमी करण्याची भाजपाची चाल आहे. मनावर ठेवलेला दगड भाजपाला जड होतोय. यांचं गोमुत्रधारी हिंदुत्व काही कामाचं नाही. यांचं बुरख्याचं रुप लोकांसमोर येऊ लागलंय असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.