Malegaon blast verdict : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाशी संबंधित खटल्यावर आज (ता. ३१) विशेष 'एनआयए' न्यायालयाने निकाल दिला. बॉम्बस्फोटातील सर्व सातही संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. आरोपींविरोधात पुरावे नाहीत. केवळ संशयाच्या आधारावर त्यांना दोषी ठरवता येणार नाहीत. असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या सातही आरोपींना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी करण्यात आली होती. मात्र कोर्टाने या सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
२९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात मशिदी जवळ मालेगावमधील भिकू चौकात ठेवण्यात आलेल्या एका दुचाकीचा स्फोट झाला होता. फरहीन उर्फ शगुफ्ता शेख लियाकत, शेख मुश्ताक शेख युसूफ, शेख रफिक शेख मुस्तफा, इरफान जियाउल्ला खान, सय्यद अजहर सय्यद निसार, हारुन शहा मोहम्मद शहा हे सहा जण यामध्ये मृत्यूमुखी पडले. १०० हुन अधिक जण यात जखमी झाले होते.
न्यायालयाने नेमंक काय म्हटलं?
तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला. बॉम्ब ब्लास्ट झाल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले. परंतु ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाने सांगितले. तसेच तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य पद्दतीने करण्यात आला नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असेही निरिक्षणही न्यायालयाने नोंदवले.
दुचाकीचा चेसीस नंबर रिकव्हर करण्यात आला नाही. तसेच दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची होती हे देखील स्पष्ट नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की, एनआयएकडून सादर करण्यात आलेले पुरावे आरोपींना दोषी सिद्ध करण्यास अपुरे आहेत.
आधी लावण्यात आलेला मोक्का कायदा नंतर मागे घेण्यात आल्यामुळे त्या अनुषंगाने नोंदवलेले जबाब न्यायालयाने अविश्वसनीय ठरवले. . UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची असल्याने UAPA लागू होत नाही असं न्यायालयाने नमूद केलं. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याआधी घेतलेल्या मान्यतेवर देखील न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. तसेच, स्फोटक आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणांकडे नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. या प्रकरणातील सर्व आरोपींना ‘संशयाचा लाभ’ (Benefit of Doubt) देण्यात येत असून, केवळ संशयाच्या आधारावर दोष निश्चित करता येत नाही, त्यामुळे सर्व आरोपी निर्दोष घोषित करण्यात येत आहेत, असा स्पष्ट उल्लेख न्यायालयाने आपल्या निकालात केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र ATS कडे होता, त्यानंतर तो NIA कडे वर्ग करण्यात आला. 2016 मध्ये NIA ने दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं. तरीसुद्धा, न्यायालयाने त्यांच्या विरोधात UAPA अंतर्गत आरोप कायम ठेवत खटला सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या खटल्यादरम्यान एकूण 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, त्यापैकी 34 साक्षीदारांनी नंतर आपली भूमिका बदलली ते फितूर झाले. तब्बल 17 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायप्रक्रियेनंतर अखेर आज या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.