

Maharashtra Crop Loan Waiver : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या यादीत असलेल्या, मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल्या शेतकरी खातेदारांच्या वारसांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.
मृत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर वारस नोंद करून त्यांची सुधारित माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याबाबत सहकार आयुक्तांनी राज्यातील संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.
राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारने कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16.96 लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यापैकी 13.48 लाख लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, सुमारे 3.48 लाख लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेतील पात्र शेतकरी (Farmer) खातेदाराचा आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी संबंधित कर्ज खात्यावर वारस नोंद करावी लागणार आहे. वारसांची नोंद झाल्यानंतर सुधारित माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे.
मृत शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरून हाताळणे, त्यांच्या वारसांची माहिती पूर्ण करणे आणि सुधारित तपशील अपलोड करण्यासाठी महाआयटीमार्फत मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मृत शेतकऱ्याच्या वारसांची माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित कर्ज खाते आणि त्यातील नोंदींची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा बँकेच्या संबंधित शासकीय लेखापरीक्षकांमार्फत कर्ज खात्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर मृत शेतकऱ्याचे पूर्वीचे कर्ज खाते क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.
महाआयटीमार्फत या माहितीचे संस्करण झाल्यानंतर लाभासाठी पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्यांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित प्रक्रियेत अॅग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक असणार आहे. तसेच वारसांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक वारसपत्र किंवा अधिकृत वारस नोंदीची पूर्तता करावी लागणार आहे.
एका मृत शेतकऱ्याचे एकापेक्षा अधिक वारसदार असल्यास कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या हिश्श्यानुसार संबंधित कर्ज खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. वारस नोंद आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात सध्या लाखो शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू असताना, मृत लाभार्थ्यांच्या वारसांनाही योजनेच्या कक्षेबाहेर ठेवले जाणार नाही, हे या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.