

Ahilyanagar news : अहिल्यानगर महापालिका हद्दीतील लाल टाकी परिसरात उभारण्यात आलेल्या भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार जवाहरल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत काहींनी हटवण्याची मागणीवर काँग्रेसने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
ही मागणी दुर्दैवी, निषेधार्ह आणि देशाच्या इतिहासाचा अपमान करणारी आहे, असा घणाघात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिली.
काँग्रेसचे (Congress) दीप चव्हाण म्हणाले की, "लाल टाकी परिसरातील पंडित नेहरूंचा पुतळा तत्कालीन नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या कार्यकाळात उभारण्यात आला होता. त्या काळात या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला होता. आकर्षक बगीचा, धबधब्यासारखे कारंजे, विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरणामुळे लाल टाकी परिसर हा अहिल्यानगरच्या वैभवाचे प्रतीक बनला होता. नेहरूंचा पुतळा ही शहराची ओळख आणि शान मानली जात होती."
मात्र, सध्याच्या परिस्थितीत परिसरात अस्वच्छता, कचरा आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून, यासाठी पूर्णपणे महापालिका (Municipal) प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्य विभाग आणि उद्यान विभागाने नियमित स्वच्छता व देखभाल केल्यास परिस्थिती सुधारू शकते.
तसेच परिसरात अवैध प्रकार किंवा मद्यप्राशनासारख्या घटना घडत असतील, तर त्यावर नियंत्रण ठेवणे हे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या अपयशाचे खापर पंडित नेहरू यांच्या पुतळ्यावर फोडणे चुकीचे आहे, असा घणाघातही दीप चव्हाण यांनी केला.
दीप चव्हाण यांनी पुढे सांगितले की, तत्कालीन नगरसेविका शीला चव्हाण यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मनपाला 5 कोटी रुपयांच्या निधी मिळाला आहे. यातून लाल टाकी परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे तसेच महासभेत प्रश्न उपस्थित करून केली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, देशाच्या जडणघडणीत नेहरूंचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात औद्योगिक क्रांतीची पायाभरणी झाली. आयआयटी, मोठी धरणे, भाकरा नांगलसारखे प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची संकल्पना त्यांनी देशाला दिली. शिक्षण, विज्ञान आणि लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही देशसेवेसाठी बलिदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.
“किरकोळ प्रसिद्धीसाठी काही जणांकडून थातूरमातूर पत्रकबाजी करून देशाच्या थोर नेत्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले जात आहे. काँग्रेस पक्ष हे कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशाराही दीप चव्हाण यांनी दिला. तसेच, महापालिकेने कोणत्याही दबावाला बळी न पडता पंडित नेहरूंचा पुतळा हटवण्यासंदर्भात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.