

Ahilyanagar local election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची अहिल्यानगरमधील नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. माजी आमदार तथा नवनिर्वाचित दक्षिण जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी निवडणूक जिंकण्याची गणित सांगितलं.
'भाजपचा 'बाऊ' करत बसू नका. आपल्या कार्यकर्त्यांनी दररोज दोन तास पक्षाला द्या. तसंच मतदानाच्या वेळी सायंकाळी केंद्रावर मतदारांची चाळणी करावी. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र सोडू नका. मतदान केंद्रावर सायंकाळीच घात होत असतो. कार्यकर्ते उपस्थित नसल्याचा गैरफायदा समोरचा सत्ताधारी घेतो. इथं या काळात व्यवस्थित फिल्डिंग लावून गडबड होऊ न दिल्यास विजय आपलाच,' असा दावा दादा कळमकर यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या (MVA) माध्यमातून लढविण्यास प्राधान्य देणार आहे. यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करून, मित्र पक्षांची जागावाटपाच्या वाटाघाटी करेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा झेंडा खाली येऊ द्यायचा नाही, असा निर्धार आढावा बैठकीत केल्याचे दादा कळमकर यांनी सांगितले.
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात 'ऑपरेशन लोटस' सुरू केलं आहे. या सर्वाधिक लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार लक्ष्य असणार आहे. यावर दादा कळमकर म्हणाले, "ज्यांचे हात दगडाखाली आहेत ते त्यांच्याकडे जातील. सर्वसामान्य माणसं आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळे जमा करत महाराष्ट्र धर्म जागवला, त्याचपद्धतीने आम्ही काम करत आहोत."
81 वर्षांच्या दादा कळमकर यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीचा किस्सा सांगितला. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना 1999 मध्ये केली. त्यामुळे पक्ष विस्कळीत होता. पण कार्यकर्ते म्हणून आम्ही चिकाटीने लढलो. सर्वसामान्यांची ताकद आम्हाला मिळाली. पहिल्याच निवडणुकीत जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक ताब्यात घेतली. सध्या 1999 सारखीच परिस्थिती आहे. पण कार्यकर्त्यांनी ग्राऊंड लेवला काम केल्यास विजय सोपा आहे, असे दादा कळमकर यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी भाजपचा 'बाऊ' करत बसू नये, असा सल्ला देताच, त्यांनी कितीही पैसे वाटू द्या. मते मात्र शरद पवार यांनाच मिळणार, असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीतवेळी त्यांनी अनेक कुटाणे केली. मतचोरी केली. म्हणून त्यांची सत्ता आली. पण आता लोकांमध्ये असंतोष आहे, असे दादा कळमकर यांनी म्हटले.
'शेतकरी अतिवृष्टीमुळे रस्त्यावर आला आहे. सरकारकडून त्याला पुरेशी मदत मिळत नाही. फक्त घोषणाबाज सरकार आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात तो संघर्ष करतो आहे. अशाच कार्यकर्त्यांनी त्यांना बळ दिल्यास, विजय आपलाच होईल. त्यासाठी पक्षाला फक्त दररोज दोन तास द्या. निवडणुकीच्या मतदानावेळी मतदान केंद्र सोडू नका. मतदानाच्या दिवशी सायंकाळीच घात होत असतो. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांची चाळणी करून घ्यावी. मतदान केंद्रावर सायंकाळी गैरहजर राहिल्यास, त्याचा फायदा समोरच्याला होतो, हे लक्षात घ्या, हे होऊ देऊ नका', असा सल्ला दादा कळमकर यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.