
Ajit Pawar NCP latest news : 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बबनराव पाचपुते यांचं तोंडचं पाणी पळवणारे घनश्याम शेलार यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून निवडक कार्यकर्त्यांसह त्यांनी हा प्रवेश केला. गेल्या वर्षभरात त्यांनी तीन पक्ष बदलल्याने, इथं किती दिवस टिकणार? पुढ कोणत्या पक्षाचा नंबर असणार? अशी चर्चा आहे.
घनश्याम शेलार यांनी अनेक वेळा केलेल्या पक्षांतरामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले आहेत. भाजप (BJP), राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी मग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, असा प्रवास करत शेलार यांनी 'बीआरएस'ची वाट धरली होती. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून नीलेश लंके यांचा प्रचार केला.
2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या उपस्थितीत 'प्रहार'मध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र शेलार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत बच्चू कडू यांना अवघ्या आठ दिवसात रामराम केला. शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
काँग्रेसकडे केलेल्या प्रवासाला पूर्णविराम देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसोबत अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशावर घनश्याम शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील, राज्यामधील नेते आणि माझे कार्यकर्ते पक्ष प्रवेशाबाबत आग्रही होते. श्रीगोंद्यातील मंदिर प्रवेशावर अजितदादांकडे गेलो असताना, त्यांनी राजकीय भूमिकेवर विचारणा करत, प्रवेश कधी करणार, यावर थेट विचारले. मेळावा घेतो, असे सांगितल्यावर, त्यावर त्यांनी देशात युद्धस्थिती आहे, पक्ष मेळावा घेण्यापेक्षा लगेच प्रवेश करा अशा सूचना देता, हा प्रवेश घडून आला', असे शेलार यांनी सांगितले.
घनश्याम शेलार यांचा राजकीय प्रवासाला भाजपमधून सुरुवात झालेली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक लढली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या तोंडचं पाणी पाळवलं होतं. त्यावेळी त्यांचा केवळ 750 मतांनी पराभव झाला होता. माजी आमदार राहुल जगताप हे राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाल्याने शेलार अस्वस्थ होत, 'बीआरएस'मध्ये झाले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी घनश्याम शेलार यांच्या या निर्णयावर तोफ डागली आहे. काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही. घनश्याम शेलार हे राष्ट्रवादीत गेले हे फार काही नवल वाटण्यासारखे नाही. त्यांनी आत्तापर्यंत बरेच पक्ष बदलले आहेत. दुसरीकडे कुठे जायचे, असा कोणताच पक्ष त्यांच्याकडे राहिलेला नाही. काँग्रेस पक्षात घुसमट होत असेल, तर त्यांनी माझ्याकडे चर्चा करणे गरजेचे होते. काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे, असे कोणी पक्षात आले आणि गेले त्यानं पक्षाला फार फरक पडत नाही, असेही वाघ यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.