Demolition of Historic Building in Nashik: एकोनीसाव्या शतकात स्वतंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पगडा होता. त्यामुळे बहुतांशी शहरांमध्ये हमखास ‘यशवंत मंडई’ अशी वास्तू आढळते. नाशिक शहरातही हा वारसा सांगणारी वास्तू शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभी आहे.
नाशिक शहराच्या इतिहासात ‘यशवंत मंडई’ अर्थात रविवार कारंजा हे एक महत्त्वाचे ठिकाण. एकेकाळी शहराचे आणि काँग्रेस पक्षाचे सबंध राजकारण या वास्तुतून चालत असे. रविवार कारंजा ही बाजारपेठ, शेजारी मेन रोड आणि लगतच पेठे विद्यालय या तीन गोष्टींमुळे या मंडईला विशेष महत्त्व होते.
लोकसभेच्या १९८० च्या निवडणुकीत डॉ प्रताप वाघ हे काँग्रेसचे उमेदवार होते. १९८९ मध्ये डॉ. डी. एस. आहेर हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते. १९९१ मध्ये डॉ. वसंतराव पवार हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. हे तिन्ही डॉक्टर लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. डॉ. पवार आणि डॉ. आहेर यांनी १९९१ मध्ये एकमेकांच्या विरोधात उमेदवारी केली.
तिन्ही माजी खासदारांचे दवाखाने यशवंत मंडईत एकमेकांच्या शेजारी होते. त्यामुळे निवडणुकीचे सबंध राजकारण देखील येथूनच चालत असे. डॉ. आहेर १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यावर आरोग्यमंत्री झाले. त्यामुळे नाशिकला तीन खासदार आणि राज्याला एक मंत्री देणारी वास्तू म्हणून यशवंत मंडईचा इतिहासात संदर्भ आहे.
नगरपालिका असो वा विधानसभा किंवा लोकसभा प्रत्येक निवडणुकीची मुख्य प्रचारसभा रविवार कारंजा अर्थात यशवंत मंडई येथेच होत असे. त्यात यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, शरद पवार यांना पासून तर शिवसेनेसाठी दादा कोंडके यांची ऐतिहासिक सभा देखील याच ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात यशवंत मंडई ही एक महत्त्वाची राजकीय वास्तू म्हणून गणली जाते.
पूर्वी येथे ब्रिटीशांचे सब जेल होते. (कै.) शांताराम बापू वावरे हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्यावर (ते शहराचे प्रथम महापौर देखील होते) त्यांनी सब जेल पाडून तेथे यशवंत मंडई उभारण्याचा निर्णय घेतला. ही इमारत बांधून झाल्यावर तिचे उद्घाटन राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याच हस्ते झाले.
त्या वस्तूचे नाव देखील त्यानुसारच यशवंत मंडई असे देण्यात आले. अगदी सध्या महापालिकेचा भाग असलेल्या देवळाली नगरपालिकेची देखील देवळालीगाव येथे यशवंत मंडई आहे. ज्याप्रमाणे बहुतांशी बाजार समित्यांना सहकारातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव दिले जाते तसेच साठ, सत्तरच्या दशकात (कै) यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर पगडा होता. त्यामुळे अनेक शहरांमध्ये यशवंत मंडई हमखास दिसते.
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ब्रिटिशांच्या राजवटीत नाशिक शहरातील यशवंत मंडई येथे सबजेल होते. लहान गुन्ह्यातील कैद्यांना येथे कैदेत ठेवले जात असे. शेजारीच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घोड्यांना पाण्यासाठी हौद होता. या भागाचा एक वेगळाच दरारा होता.
या इमारतीत तळमजल्यावर सहकार भवन हे कापडाचे दुकान तर अन्य ठिकाणी डॉक्टर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट असे विविध कार्यालय होती. काळाच्या ओघात १९६७ मध्ये बांधण्यात आलेली यशवंत मंडई आता देखभाली अभावी जर जर्जर झाली आहे. त्यामुळे माजी (कै) नगरसेविका सुरेखाताई भोसले यांनी काही वर्षांपूर्वी या इमारतीच्या ठिकाणी नवी वास्तू उभारावी असा प्रस्ताव स्मार्ट सिटीला दिला होता.
स्मार्ट सिटीने त्याला मंजुरी मिळाल्याने स्मार्ट सिटीने ही वास्तू पाडून नवी इमारत बांधण्याच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात महत्त्वाचा संदर्भ असलेली यशवंत मंडई लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. राजकीय क्षेत्रातल्या जाणत्या आणि जुन्या कार्यकर्त्यांसाठी ही मनाला सलणारी घटना म्हणावी लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.