

Rayat Shikshan Sanstha : भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या रयत शिक्षण संस्थेवर निशाणा साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, विखे पाटलांनी संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांच्यासमोरच टीका केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी, "कर्मवीर भाऊराव पाटील यांनी, स्वावलंबी शिक्षण हेच ब्रीद असे ब्रीदवाक्य घेऊन रयत शिक्षण संस्था उभारली होती. आता याच संस्थेने राजकारणापलीकडेही विचार करायला हवा, असा टोला लगावला. तसेच संस्थेची ढासळत चाललेली शैक्षणिक गुणवत्ता आणि वाढणाऱ्या खासगी क्लासेसच्या प्रभावावर चिंता व्यक्त केली.
मंत्री विखे पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेवर राजकीय दृष्टिकोनातून निशाणा साधत असतानाच, त्यावेळी या कार्यक्रमाला संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) उपस्थित होते. त्यांच्याच समोर संस्थेवर मंत्री विखे पाटील यांनी निशाणा साधल्याने अन् आमदार काळे यांनी शांत भूमिका घेतल्याने चर्चाचा विषय ठरला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या, महान विचारांतून उभी राहिलेली रयत शिक्षण संस्था ग्रामीण आणि वंचित समाजासाठी शिक्षणाचे महाप्रवेशद्वार आहे. ‘कमवा आणि शिका’ हा संदेश देत रयतने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. असे असतानाच भाजप मंत्र्यांनी राजकीय दृष्टिकोनातून केलेल्या आरोपांना उत्तर विभागांच्या अध्यक्ष आमदारांनी मौन बाळगणं हे कितपत योग्य आहे, यावर संस्थेमधील पदाधिकाऱ्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
विखे पाटील यांनी ज्या दिवशी हा घणाघात साधला, त्याच दिवशी संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार काळे हे अहिल्यानगर इथल्या रयत संस्थेच्या कार्यालयात शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहून आले होते. म्हणजेच संस्थेच्या धोरणात्मक चर्चेत सहभागी झाल्यानंतर काही तासांतच, त्यांच्यासमोर संस्थेवर सार्वजनिक टीका झाली.
मंत्री विखे पाटील यांनी रयतच्या कारभारावर बोलत असताना त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसच्या जाळ्यावर देखील भाष्य केलं. कोचिंग क्लासेस ही पालकांची लूट आहे. विद्यार्थ्यांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलण्यासारखे आहे. दर्जेदार शिक्षण महाविद्यालयांनी दिल्यावर, क्लासेसची गरज भासणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
आमदार काळे यांची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय भूमिका काहीशी सावध झाली आहे. सत्तेत सहभागी असल्याने, अन् अजितदादांचे राजकीय छत्र नसणे आणि मतदारसंघातील राजकीय प्रभाव टिकून ठेवणे, यासाठी आमदार काळे सत्तेतील मोठा पक्ष भाजपशी जवळीक वाढवताना दिसत आहेत. अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचे छायाचित्र समाज माध्यमांवर शेअर करणे, मंत्री विखे पाटलांशी वाढवलेली अधिकची जवळीक, हे सर्व त्याचेच द्योतक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.