रश्मी पुराणिक
Balasaheb Thorat & Nana Patole : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकी दरम्यानच, आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. तसेच काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती. यामुळे हा वाद आणखीच पेटला. यादरम्यान, माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मौन बाळगले होते.
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळविला. यानंतर तांबेंनी पत्रकार परिषदेत पटोलेंवर गंभीर आऱोप केले होते. यानंतर आता बाळासाहेब थोरातांनीही तांबे- पटोले वादावर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं आहे.
बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी थोरातांनी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचं विजयाबद्दल अभिनंदन तर केलेच शिवाय नाशिक पदवीधर निवडणुकीवरुन पेटलेल्या वादावरही परखड शब्दांत भाष्य केलं आहे. तसेच पक्षश्रेष्ठींकडे पत्राद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचेही सांगितले.
थोरात म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.
तसेच माझ्याविषयी इतका राग असेल तर पटोलेंबरोबर काम करू शकत नाही. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले.सार्वजनिकरीत्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली असाही आरोप थोरात यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणी आणलं जात आहे. नगरमधील कार्यकर्त्यांवर कारवाई झाली. त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ असा मला विश्वास आहे असेही ते म्हणाले.
''आपल्याला अगदी भाजपाच्या दारात नेऊन पोहचवलं..''
काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळात अशा बातम्या आल्या की, आपल्याला अगदी भाजपाच्या दारात नेऊन पोहचवलं होतं. एवढंच नाही तर भाजप(BJP) च्या तिकिटाचे वाटप देखील करून टाकलं. काही लोक गैरसमज पसरवण्याचे काम करताय. त्यांनी अनेक प्रकारच्या चर्चा घडवून आणल्या.आतापर्यंत काँग्रेसच्या विचाराने वाटचाल केली. पुढील वाटचाल त्याच विचाराने राहणार याची ग्वाही देतोय असं स्पष्ट मतही व्यक्त केलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.