NCP Sharad Pawar News : शेतकरी कर्जमाफी हा महायुती सरकारसाठी दिवसेंदिवस अडचणीचा विषय ठरवू लागला आहे. मोठ्या बहुमतासह सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला हा प्रश्न भविष्यात राजकीय अस्वस्थतेचे कारण ठरण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारच्या जळगाव दौऱ्यात त्याची चुणूक दिसली.
या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेल्या राजकीय आंदोलनाने मुख्यमंत्र्यांना राज्यात सर्वकाही गोड गोड नाही, याची जाणीव करून दिली. पिंप्री (धरणगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा त्याची दखल न घेताच निघून गेला.
यावेळी पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्यासह कल्पिता पाटील, उज्वल पाटील, संजय पाटील, हितेंद्र पाटील, अमोल हरपे, रियाज देशमुख यांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते घोषणा देत होते. हे कार्यकर्ते अचानक आक्रमक झाल्याने पोलिसांची ही धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणली मात्र या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली.
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेसह महायुतीसाठी प्रत्येक मतदार लाडका होता. यावेळी शेतकऱ्यांसाठी तोंड भरून घोषणा करण्यात आल्या. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी करणार अशी घोषणा केल्याचा दावा केला जातो. फडणवीस यांनीही कर्जमाफी करणार अशी घोषणा केली होती, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
महाविकास आघाडी कमकुवत करून त्यातील प्रस्थापित नेत्यांना महायुतीने आपल्याकडे प्रवेश दिला आहे. नेत्यांची फंद फितुरी झाली तरी राज्यातील सरकार बाबत मतदारांमध्ये कर्जमाफीच्या प्रश्नावर वातावरण तापू लागले आहे. विशेषतः ग्रामीण भागात यावर संताप आहे. मुख्यमंत्र्यांच्या जळगावच्या दौऱ्यात त्याची प्रचिती आली.
गेल्याच आठवड्यात प्रहार संघटनेचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफी प्रश्नावर सहा दिवस अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनाने राज्यभर प्रतिक्रिया उमटल्या. विविध जिल्ह्यात आंदोलनाच्या समर्थनासाठी निदर्शने झाली. राज्य शासनाची ही धावपळ उडाली हे लपून राहिले नाही.
कर्जमाफी घोषणा केलीच नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत केले होते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे हे आता लपून राहिले नाही. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर अव्यवस्था निर्माण होऊ लागली आहे. त्याचा रोष प्रामुख्याने अर्थमंत्र्यांवर आहे. याच स्थितीचा फायदा विरोधी पक्षांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात प्रचंड बहुमत असलेल्या महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न स्वस्थ झोप लागू देणार नाही, असा राजकीय संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून जळगावच्या दौऱ्यात मिळाला असे म्हणता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.