
voter list irregularities Sangamner : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा बिगूल कधीही वाजू शकतो. सत्ताधारी अन् विरोधकांकडून तशी तयारी सुरू आहे. या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचा घोळ चर्चेत आहे. विरोधक अन् सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून फैरी सुरू आहे. पण यात मतदार याद्यांचे जे काम पाहतो, तो राज्य निवडणूक आयोग मात्र अलिप्त आहे.
निवडणूक आयोग सोडून, विरोधक अन् सत्ताधाऱ्यांमध्ये मतदार याद्यांतील घोळांवर राज्यभरात जुंपल्याचे चित्र आहे. आता संगमनेरमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यात यावरून जुंपली आहे. या दोघांच्या आरोपांमध्ये भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील उडी घेतली आहे.
संगमनेर (Sangamner) मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. याच मुद्द्यावरून आता थोरातविरुद्ध विखे पाटील-खताळ आता मैदानात उतरले आहे.
मतदार याद्यातील साडेनऊ हजार नावांमध्ये घोळ असल्याचा दावा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला. या आरोपाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला हवे. परंतु, सत्ताधारी आमदार अमोल खताळ यांनी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संगमनेरच्या मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा दावा करताना, नावांची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तहसीलदार म्हणतात नावं वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही. एका बाजूला म्हणतात चुका दुरूस्त करू, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात आम्हाला अधिकार नाही. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा बनवाबनवीचा कार्यक्रम सुरू आहे, असा गंभीर आरोप थोरातांनी केली.
बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपावर सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार अमोल खताळ यांनी प्रतिक्रिया दिली. 'थोरात आमदार असतानाच संगमनेर मतदारसंघात अनेक बोगस मतदार नोंदले गेले. पालिका निवडणुकीपूर्वी देखील थोरात यांच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आला. महायुतीकडून आम्ही त्यासंदर्भात हरकती नोंदवल्या आहेत,' असे आमदार खताळ यांनी म्हटले आहे.
'गेली 40 वर्षे इथे बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या बगलबच्च्यांची दहशत होती. त्यांना विकास करता आला नाही. मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे संगमनेर मतदारसंघातील सामान्य जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव होणार असल्याने भीतीपोटी बोगस मतदार आणि याद्यांबाबत आरोप सुरू आहेत. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेलं नाही,' असा टोला आमदार खताळ यांनी लगावला.
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या दोघांच्या आरोपांमध्ये उडी घेत, थोरातांना सुनावलं आहे. ते म्हणाले, "40 वर्षात बाळासाहेब थोरातांनी मतदार वाढवूनही त्यांचा पराभव झाला आणि त्याचे खापर मतदारांवर फोडत आहेत. या सगळ्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.