

Nashik Politics : आगामी कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिकमध्ये एकाच वेळी विविध कामे हाती घेतलेली आहे. या कामांसाठी रस्ते खोदले जात आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवरील वाढते खड्डे, धूळ प्रदूषण आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. असे विविध मुद्दे उपस्थितीत करत नाशिक भाजपच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडत प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
नाशिक महापालिकेचे कामकाज पूर्णपणे दिशाहीन झाले असून शहरातील विविध विकासकामांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे आमदार फरांदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून नमूद केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था, वाढते धूळ प्रदूषण आणि अपघातांची शक्यता वाढत असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केली जात नसल्याची टीका आमदार फरांदे यांनी केली.
विशेषतः गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी एमएनजीएल कंपनीकडून वारंवार रस्ते खोदले जात असून या कामांसाठी महापालिकेकडून ना- हरकत प्रमाणपत्र दिले जात असले तरी प्रत्यक्षात प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते खोदले जात असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते तोडफोड फी वसुल केली जात असली तरी त्या निधीचा रस्ते दुरुस्तीसाठी वापर न करता इतर प्रयोजनासाठी वापर होतो. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून महापालिका प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची मागणी फरांदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
वास्तविक नाशिक महापालिकेत चार वर्ष प्रशासकीय राजवट होती. या काळात लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदारांकडूनच प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात होत्या. शहरात झालेली रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, वाहतूक कोंडीचे प्रश्न हे सुरुवातीपासूनच आहेत. अशात आमदारांकडून प्रशासनाविरोधात कोणतेही ठोस अशी अॅक्शन घेण्यात आली नाही.
मात्र आता प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन महापालिका निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींची सत्ता परत आली आहे. महापालिकेत १२२ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्याच हिमगौरी -आहेर आडके या महापौर झाल्या आहेत. शहरातील खड्डे व अनियमित पाणीपुरवठा या विषयावर चर्चा करण्यासाठी आज शुक्रवारी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ही महासभा होण्यापूर्वीच आमदार फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून भाजप नगरसेवकांवरच कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.
चार वर्ष या प्रश्नांवर मौन बाळगलेल्या आमदारांना शहरात लोकनियुक्त अर्थात महापौर व नगरेसवकांचे राज्य येताच जाग आल्याचे बोलले जात आहे. चार वर्ष शहरातील या प्रश्नांवर मौन बाळगलेल्या आमदारांनी महापालिकेत नगरसेवकांची सत्ता येताच विधानसभेत प्रशासनाचा पंचनामा केल्याने आमदार विरुद्ध नगरसेवक असे शीतयुद्ध विधिमंडळात पोहचल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.