

Food and Drug Administration Maharashtra : राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे. राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे भेसळमाफियांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांकडूनही या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अशाच पार्श्वभूमीवर श्रीरामपूरमधील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक अनोखी पदयात्रा सुरू केली आहे.
अशोक लोंढे यांनी डोक्यावर भारतीय संविधान घेऊन आणि संविधानाविषयी संदेश असलेले फलक परिधान करून श्रीरामपूर ते शिर्डी (Shirdi) अशी पदयात्रा काढली. या पदयात्रेचा उद्देश केवळ तुकाराम मुंढे यांना समर्थन देणे नसून संविधानिक मूल्ये, नागरिकांची जबाबदारी आणि अन्नसुरक्षेबाबत समाजात जनजागृती करणे हा आहे. या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून अनेकांनी याला सामाजिक जागृतीची प्रभावी चळवळ असे संबोधले आहे.
प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची आतापर्यंत विविध विभागांमध्ये तब्बल 24 ते 25 वेळा बदली झाल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली. आता अन्न व औषध प्रशासन विभागातही त्यांनी भेसळविरोधी मोहिमेला वेग दिला असून राज्यभर कारवायांची मालिका सुरू केली आहे. याच कामामुळे भेसळखोर आणि संबंधित माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
आपल्या पदयात्रेबाबत बोलताना अशोक लोंढे म्हणाले, "प्रत्येक सनदी अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्याशी निष्ठा ठेवली तर त्याचा थेट फायदा समाजाला होईल. जनजागृती वाढेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल. काही अधिकारी पुढाऱ्यांचे दलाल बनण्यात धन्यता मानतात. साईबाबा अशा सर्वांना सद्बुद्धी देवो."
ते पुढे म्हणाले की, ही पदयात्रा ‘भेसळमुक्त महाराष्ट्र’ घडवण्याच्या संकल्पनेसाठी आहे. प्रशासन प्रामाणिकपणे काम करत असेल तर समाजानेही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना लोकसमर्थन मिळणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अन्नसुरक्षा, पारदर्शक प्रशासन आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारी ही पदयात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कामाला नागरिकांकडून मिळणारा असा थेट पाठिंबा प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. भेसळविरोधी लढ्यात शासनासोबत समाजही सक्रिय झाला तर ‘भेसळमुक्त महाराष्ट्र’चे स्वप्न साकार होऊ शकते, असा संदेश या पदयात्रेतून दिला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.