

Jalgaon Municipal Election : जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवाराला पोलिसांनी सकाळी दोन तास घरातून बाहेर पडू न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगावच्या पिंप्राळा परिसरातील शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवार मयूर कापसे यांच्याबरोबर हा प्रकार घडला. घरी सकाळी साडेसात वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा त्यांच्या घरी पोहोचला होता. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
'पोलिसांनी आम्हाला घराबाहेर निघू नका, असे सांगून, आम्हाला घराबाहेर पडू दिले नाही,' असा गंभीर आरोप उमेदवार मयूर कापसे यांच्या बंधूंनी केला. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी उमेदवाराचे हे आरोप फेटाळून लावले.
शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षाचे उमेदवार मयूर कापसे यांचे बंधू म्हणाले, "सकाळी पोलिस घरी आले. त्यांनी आम्हाला घराबाहेर पडू नका असे सांगितले. ही कोणती पद्धत आहे. आम्हाला मतदान देखील करू देणार नाही का? ही कोणती पद्धत आहे. लोकशाही मार्गाने लढा. आम्हाला धमकावयाचे, पैसे पाठवायचे, मुल पाठवायचे, कधी प्रशासनाकडून दबाव आणायचा हे चुकीचे आहे."
"माझा भाऊ जळगाव (Jalgaon) महापालिका निवडणूक लढत आहे. त्यात त्याच्या कुटुंबियांची काय चुकी आहे. कुटुंबातील महिला, लहान मुलांची काय चुकी आहे. जवळपास दोन तास पोलिस होते. मानसिकदृष्ट्या खूप त्रास दिला. अजूनही घरी बसून ठेवलं आहे. भारतात संविधान राहिलं आहे की, नाही? लोकशाही राहिलं नाही का?" असा प्रश्न मयूर कापसे यांचे बंधू यांनी केला.
'हुकुमशाहीविरोधात मतदान करा, योग्य उमेदवार निवडा, आज आमच्या कुटुंबाबरोबर हा प्रकार घडला आहे, उद्या तुमच्या कुटुंबाबरोबर घडेल, हा सर्व प्रकार जाणूनबुजून केला जात आहे. संपूर्ण जळगाव, पिंप्राळा बघत आहे. आम्ही संविधान मार्गानेच लढू, लोकशाही मार्गाने लढू, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरूषांना मानणारे आहोत. आम्ही संयमाने लढतो आहे. त्याच्यातून विरोधकांच्या पाया खालची जमीन सरकली आहे. त्यातून दबाव आणला जात आहे,' असा गंभीर आरोप मयूर कापसे यांचे बंधू यांनी केला.
उमेदवार मयूर कापसे यांच्या बंधूंनी केलेल्या आरोपावर अतिरीक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "कापसे कुटुंबियांचे आरोपात तथ्य नाही. सकाळी मतदान सुरू होत असताना, आचार संहिता कक्षाला फोन आला होता. पिंप्राळा इथले उमेदवार त्यांच्या घराजवळ तीनशे-चारशे लोकांचा जमाव जमला आहे. कशासाठी झाली आहे, त्याची चौकशी करण्यात आली."
'पोलिसांच्या भरारी पथकाने, तपासणी केली. यात पथकाला त्यांच्या निवासस्थान परिसरात दोनशे ते अडीचशे दुचाकीवर जमाव दिसला. उमेदवार मतदारांना मतदान स्लिप वाटत होता. यावर पोलिसांनी समजावून सांगितलं की, उमेदवारांना असं करता येणार नाही. मतदारांना घरी बोलवता येणार नाही. यावर उमेदवारांनं आम्ही बोलावून घेतलं नाही, तर मतदार स्वतःहून आले आहेत, असे सांगितले. मतदान केंद्राबाहेर सुविधा आहे, असे सांगितल्यावर तिथून जमाव निघून गेला. त्यानंतर पोलिस निघून गेले, असे अतिरीक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितलं.
'पोलिसांनी कुठलाही पक्षपात करत नाही. उमेदवाराचं देखील समाधान झालं होतं. पण कुणी असे का आरोप करत आहे, हे समजलं नाही. पोलिसांनी कोणालाही डांबून ठेवलेलं नाही. असा कोणताही प्रकार झालेला नाही. त्यांच्या निवासस्थानात पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा प्रवेश केला नाही,' असेही अतिरीक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.