
Jalgaon News : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 100 नुसार प्रांताधिकाऱ्यांना 'सर्च वॉरंट' जारी करण्याचे अधिकार असतात. एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने बंदिस्त केले जात असेल तर अशा परिस्थितीत प्रांताधिकारी हा अधिकार वापरु शकतात. चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी याच अधिकाराचा वापर केला व त्यामुळे अपहरण झालेल्या 16 वर्षीय मुलाची सुटका झाली आहे. या सुधारित कायद्याचा राज्यात पहिल्यांदाच वापर करण्यात आला असून बहुधा राज्यातील ही पहिलीच अशी कारवाई असू शकते असही प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी सांगितले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील शेतमजूर शोभाबाई कोळी या सोळा वर्षीय मुलगा मयूर सोबत राहतात. त्या ऊसतोडणीसाठी जात असतात. 1 सप्टेंबरला सकाळी दोन मुकादम त्यांच्या घरी आले. मुकादम परभत गायकवाड (रा. हिसवाळ, ता. मालेगाव) व दीपक भगत (रा. बारामती, जि. पुणे) अशी त्या दोघांची नावे. दोघांनी शोभाबाईंना त्यांचा मुलगा मयूर याला कामाला घेऊन जायचे आहे, असे सांगून त्याला घेऊन गेले. मात्र दुपार होऊनही मयुर घरी परतला नाही. त्याचा मोबाईलही बंद लागत होता. त्यानंतर सायंकाळ झाली तरी मुलगा घरी न आल्याने शोभाबाईंना काळजी वाटू लागली होती.
तेवढ्यात मयुरला घेऊन गेलेल्या दोन्ही मुकादमांचा फोन आला आम्ही तुझ्या मुलाला बारामती येथे घेऊन आलो आहोत, तुला तुझा मुलगा परत पाहिजे असेल, तर आम्हाला चार लाख रुपये आणून दे, नाही तर आम्ही तुझ्या मुलाला कर्नाटकमध्ये विकू वा त्याचे हात-पाय तोडून टाकू' अशी धमकी त्यांनी दिली.
त्यानंतर घाबरलेल्या शोभाबाईंनी पोलिस ठाणे गाठले. परंतु पोलिसांनी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. दोन दिवस होऊनही कुठलीच कार्यवाही पोलिसांकडून झाली नाही. त्यानंतर शोभाबाईंनी अॅड. प्रेम निकम व रिकेश गंगेले या दोन्ही वकिलांची मदत घेतली. दोन्ही वकिलांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय नागरिक सुरक्षा कायदा 2023 च्या कलम 100 अन्वये चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्याकडे संशयितांविरुद्ध 'सर्च वॉरंट'चा अर्ज दाखल केला. प्रांताधिकारी हिले यांनी तत्काळ दखल घेत संशयितांविरुद्ध 'सर्च वॉरंट'चा आदेश पारित केला. अपहरण करणाऱ्यांचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाची सुटका करावी असे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी चाळीसगाव पोलिसांना दिले. त्यावरून पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी तत्काळ शोधमोहीम राबविली.
शोभाबाईंनी पोलिसांत तक्रार दिल्याचे समजताच अपहरणकर्त्यांनी मयूरला बारामती येथून अपहरण करणाऱ्यांचे सहकारी परशुराम गायकवाड व संजय सोनवणे (रा. कोपरगाव) बिलाखेड (ता. चाळीसगाव) येथे घेऊन आले. त्यांनी शोभाबाईंना तसे कळविल्यावर त्या नातेवाइकांसह आल्या. मयूरला तेथेच सोडून ते पसार होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई हवालदार प्रशांत पाटील, सुनील खैरनार, दत्तू साळवे, अशोक मोरे यांनी केली. मुख्य संशयित परभत गायकवाड व दीपक भगत फरार आहेत.
दरम्यान या कारवाईनंतर प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी समाधान व्यक्त केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम-१०० नुसार मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून 'अटक वॉरंट' काढले. यामुळे पोलिसांनी कारवाई केली. शोभाबाईंना त्यांचा मुलगा परत मिळाला, याचे समाधान आहे. बहुधा राज्यातील ही पहिलीच अशी कारवाई असू शकते असं हिले यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.