

Dhule Politics : भाजपचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जयकुमार रावल यांनी मोठा इतिहास घडवला आहे. त्यांनी जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद संपूर्णपणे बिनविरोध करुन दाखवली आहे. येथील नगरपरिषदेच्या भाजपच्या सर्व 26 जागा बिनविरोध झाल्या असून राज्यातील ही पहिलीच बिनविरोध नगरपरिषद ठरली आहे. तसेच त्यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल या देखील राज्यातील पहिल्या बिनविरोध नगराध्यक्षा ठरल्या आहेत.
अंगी असलेली सोशल इंजिनअरिंगची हातोटी वापरुन व देशमुख कुटुंबासोबत असलेली 50 वर्षांची भांडणे मिटवून रावल यांनी हा करिष्मा करुन दाखवला आहे. त्यांनी नगरपरिषदेत सत्ता आणण्यासाठी चंगच बांधला होता. त्यासाठी त्यांनी पन्नास वर्षांपासून पारंपारिक कट्टर विरोधक राहिलेल्या देशमुख कुटुंबालाच गळाला लावलं. त्यांनी सुरुवातीला कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे सख्खे बंधू माजी नगराध्यक्ष डॉ. रवीद्र देशमुख यांना गळाला लावत भाजपत प्रवेश दिला. खरे तर तिथेच त्यांनी निवडणूक जिंकली होती.
गेल्या पाच दशकांपासूनचे मंत्री यांचा गट आणि हेमंत देशमुख यांच्या गटाचे राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. मात्र, डॉ. रवींद्र देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने या दोन्ही गटांतील 50 वर्षांपासूनचा संघर्ष थांबला. रवींद्र देशमुख हे हेमंत देशमुख यांचे बंधू असल्याने देशमुख कुटुंबाची एकत्रित साथ रावल यांना मिळाली. देशमुख कुटुंब रावल यांच्यासोबत आल्याने रावल यांना दोंडाईचा मध्ये कुणी विरोधकच उरला नाही.
डॉ. हेमंत देशमुख हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतृत्व करत होते. चार जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दोंडाईचा दौऱ्यावर आले असताना त्यांनी डॉ. हेमंत देशमुख यांची भेट घेतली होती. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीची युती व्हावी, असा विचार तटकरेंनी व्यक्त केला होता. परंतु, या निवडणुकीतील सत्तासंघर्षात दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान निर्माण होण्यापूर्वीच मुत्सद्दी रावल यांनी देशमुख गटाला गळाला लावत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. रावल यांचा प्रबळ विरोधक मावळल्याने रावल यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी झाली.
त्याचबरोबर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून दोंडाईचा, शिंदखेडा पालिका क्षेत्रात बहुसंख्येने असलेल्या जाती संवर्गाच्या प्रमुख आणि प्रभाव ठेवून असलेल्या प्रतिनिधींच्या घरी जात त्यांची या निवडणुकीतील प्रतिनिधित्वाबाबत भावना जाणून घेतली. विरोधकच उरलेले नसतानाही रावल यांनी दोन्ही पालिका क्षेत्रात अनेकांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. सर्व छोट्या-मोठ्या जातींच्या इच्छुकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केवळ १८ घरे असलेल्या बोहरी, तसेच सिंधी व इतर समाजालाही पालिकेत प्रधिनिधित्व देत त्यांनी सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या टप्प्यात त्यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल या बिनविरोध नगराध्यक्षा झाल्या. त्यांच्या विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. त्यांच्या मातोश्रीसोबत त्याचवेळी सात नगरसेवक बिनविरोध झाले होते. त्यांनंतर शुक्रवारी (ता.२१) उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या सर्व 26 जागा बिनविरोध झाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.