
Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारला आज चांगलेच घेरले. हे सरकार येत्या निवडणुकीत पराभूत होणार आहे. याची जाणीव महायुतीच्या सर्व नेत्यांना झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक पूर्व मतदार संघाचे उमेदवार गणेश गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आव्हाड नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, राज्यात आणि सगळीकडे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. जनतेने यंदा राज्यात सत्तांतर करायचेच असे निश्चित केले आहे, असा दावा केला.
आमदार आव्हाड म्हणाले, सध्याच्या सरकारने अनेक प्रश्न भिजत ठेवले. सामाजिक तेढ निर्माण होईल, असे निर्णय घेतले. मराठा, ओबीसी, दलित, मुसलमान या समाजामध्ये लढाया होतील, असे त्यांचे धोरण आहे.
आमची विचारधारा ही छत्रपती शाहू, महात्मा फुले आणि डॉ आंबेडकर यांची आहे. ही विचारधारा वाचविण्यासाठी मी राज्यभर फिरेल. येत्या निवडणुकीत या सरकारने केलेल्या सामाजिक वादाच्या निर्णयाचे प्रकार उघड करीन, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
यावेळी आव्हाड यांनी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, सध्याचे सरकार महाराष्ट्राच्या हिताकडे आणि विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. गुजरातच्या पायावर डोकं ठेवून हे लोक काम करीत आहेत.
सर्व उद्योग आणि महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. असेच सुरू असले तर आपल्या मुलांना लवकरच नोकरीसाठी गुजरातला जावे लागेल. आता तशी स्थितीत निर्माण झाली आहे. हे वातावरण माझ्या देखील मतदारसंघात आहे.
जनतेला महायुतीचे सरकार कोणासाठी काम करते, हे ओळखून मतदान करावे लागेल. राज्यातील महायुतीला महाराष्ट्र विका पण आम्हाला सत्तेत बसवा, असे वाटू लागले आहे. यांना महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील जनतेची काडीची ही काळजी राहिलेली नाही. त्यामुळे या सरकारला फेकलेच पाहिजे.
आमदार आव्हाड यांनी सिंचन घोटाळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांचे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच प्रेम वाढले आहे. त्यांची जवळीक रोज वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवरच जाऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांना कोणावर काय टीका करावी, याचे भान त्यांना राहिलेले नाही.
महायुतीचे नेते महाविकास आघाडीवर लाडकी बहीण योजनेबाबत टीका करतात. त्याचाही समाचार आव्हाड यांनी घेतला. ते म्हणाले, एका योजनेसाठी सगळी तिजोरी रिकामी झाली आहे.
सगळ्या योजना या एकाच योजनेमुळे बंद पडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने त्यांच्या पायाखालची माती घसरली. त्यामुळेच या सरकारला ही योजना आणावी लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना आणणे म्हणजे, समोर पराभव दिसू लागला आहे. याचेच हे संकेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.