

BJP campaign rally Kopargaon : कोपरगावमधील नगरपालिकेची निवडणूक चांगलीच तापली आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपविरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, असा महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये राजकीय सामना होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून मंत्री विखे पाटील आणि कोल्हे यांचे कट्टर विरोधक आमदार आशुतोष काळे यांच्यातलं सख्य सर्वश्रुत आहे. भाजप युवा नेते विवेक कोल्हे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार विधानसभा लढली नसली, तरी त्यांचा अन् मंत्री विखे पाटील यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित कोपरगाव इथं प्रचार सभा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मंत्री विखे पाटील अन् कोल्हे यांच्यातला राजकीय संघर्ष समोर आला. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नगराध्यक्षपदासाठी ऐनवेळी काका कोयटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यावरून भाजपचे विवेक कोल्हे चांगलेच आक्रमक झाले अन्, त्यांनी थेट पत्रकार परिषदेत 'काका'चा 'आका' कोण आहे? तालुक्या बाहेरच्या शक्तींना सक्रिय होऊ न देण्यासाठी कोपरगावंकरांना आवाहन केलं.
युवा नेते विवेक कोल्हेंचे हे राजकीय सूचक विधान, मंत्री विखे पाटील यांचे नाव न घेता केलं होतं. परंतु इशारा थेट मंत्री विखे पाटलांकडे जात होता. कोल्हे यांच्या या राजकीय टिपणीचे पडसाद उमटणार, याचा अंदाज येत होता. त्यानुसार तो आला देखील! पण थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित, असे राजकीय खटके उडतील, असं वाटलं नव्हतं.
कोपरगाव (Kopargaon) नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी विवेक कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरवलं. मंत्री विखे पाटील देखील यानिमित्ताने कोपरगावमध्ये हजेरी लावली. विवेक कोल्हे यांनी स्वागत केलं. 'या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन मंत्री आपल्याला लाभले आहेत. दोन्ही मंत्र्यांनी आपल्यावर जरी कमी प्रेम केलं, तरी मुख्यमंत्री ते भरून काढतील,' असा टोला लगावला.
यानंतर मंत्री विखे पाटील यांनी भाषण केलं. विवेक कोल्हे यांनी 'आका'चा केलेल्या उल्लेखाचा संदर्भ घेतला. ते म्हणाले, "निवडणुकीमध्ये थेट समोर गेलं पाहिजे. किंतु-परंतु मनामध्ये नको. तुम्ही मला 'आका' म्हणा, काहीही म्हणा, मला काहीच फरक पडत नाही. पण एकदा 'आका'च्या मनामध्ये आल्यावर, तर आपण काहीही करून दाखवू शकतो. त्यामुळे आपण आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, याला मर्यादा पाहिजेत."
'आपल्याला निवडणुकीत यश पाहिजे असेल, तर आपल्या मनावर संयम असला पाहिजे, उतवळेपणानं यश मिळत नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आम्हाला स्पष्ट आदेश आहेत फडणवीस साहेबांचे, मी खात्रीने सांगतो की, कोपरगावचा नगराध्यक्ष भाजपचाच होईल. म्हणून भाचीच्या मनामध्ये शंका ठेवायचा कारण नाही. मामा विषयी ती शंकाच घेत असते. मामावर बोलत असते. तो तिचा अधिकार आहे. मामा शांत स्वभावाचा आहे, सहन करतो सगळं, असं म्हणत, मी शांत माणूस आहे का नाही? हे तुम्हाला माहिती का नाही?' असा प्रश्न मंत्री विखे पाटलांनी सभेसमोरील लोकांना केला.
'मी कोणाला काही त्रास देत नाही. मला त्रास द्यायला आवडत नाही. भाचीला सांगू इच्छितो, स्नेहलताताई चिंता करू नका ही निवडणूक आपणच जिंकणार आहोत. मनामध्ये शंका ठेवू नका, निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलो आहोत. मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडेल, त्यांचा कुठे अनादर होईल, असं होणार नाही, हे मी इथं खात्रीने सांगतो,' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
'कोपरगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आपला आणि पॅनल हे आपला हवा आहे. आपल्याला दणदणीत विजय मिळवायचा आहे. हा विजय मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा इथं कोपरगावला येणार आहे, त्यावेळेस याहीपेक्षा मोठी विजयी सभा इथं ठेवू. प्रचार सभा उत्तम आहे, उत्साह उत्तम आहे, पण लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे. अति उत्साहामध्ये चुकला, तर पाच वर्षे भोगावे लागेल, डोळे-डोकं-कान उघडे ठेवून अक्षरशः मतदान होऊन मतमोजणी होईपर्यंत शांत बसू नका,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.