

local body elections Kopargaon : भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगावच्या नगरपरिषदेमधील सत्तांतरासाठी दम भरला आहे. महायुतीमधील मित्रपक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी ललकारलं आहे.
अजितदादांचे शिलेदार आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवताना, 'भूलथापा देत आमदारकी काढून घेतली. पण आता नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये हे चालणार नाही,' असा घणाघात विवेक कोल्हेंनी केला आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत, आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. सर्वसंमतीने नगराध्यक्ष व प्रभागात सक्षम उमेदवार देणार असून कोपरगावकारांनी (Kopargaon) परिवर्तनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.
भाजपचे (BJP) विवेक कोल्हे म्हणाले, "गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेमध्ये विरोधकच नसल्याने आमदार व प्रशासकाची एकहाती सत्ता आहे. कोट्यवधींच्या वल्गना केल्या गेल्या. मात्र, रस्ते, आरोग्य, पाणीप्रश्नासह विकास ठप्प! कायदा सुव्यवस्था नसल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूलथापा देत आमदारकी काढून घेतली. पालिका निवडणुकीत मात्र जनता यांना नाकारणार आहे. मित्र पक्ष, आघाडीसमवेत आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत."
'चार वर्षे एकहाती सत्ता असताना शहरवासियांचा हिरमोड झाला. पाच नंबर पाणी तळ्याचा गवगवा केला. मात्र, वर्षभरात केवळ 61 वेळा शहरवासीयांना पाणी दिले गेले. भूमिगत गटारीचे कामे निकृष्ट आहेत. पेव्हिंग ब्लॉकमध्ये भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा आरोप अनेकांनी केला. सामाजिक सभागृहनिधीचे विविध समाजाला पत्र देऊन वर्ष उलटून गेले. बहुतांश सभागृहांना अद्याप निधी मिळाला नाही, असा आरोप विवेक कोल्हे यांनी केला.
कोपरगाव शहराचा पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत असल्याकडे लक्ष वेधताना, 2019-20 पासून आज अखेर वर्षभर सरासरी 51 ते 71 दिवस पाणी दिले गेले. पाणीपट्टी मात्र वर्षभराची. आमची सत्ता आल्यास जेवढे दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी आकारण्याचा मानस आहे. येत्या निवडणुकीत आम्ही 40 टक्के युवा चेहऱ्यांना संधी देणार आहोत. व्यापारी नारायण अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शहर विकासाचे मॉडेल ‘शहर विकासनामा’ हा वचननामा निर्मित करत आहोत. त्यात सर्व सामान्यांपासून व्यापारी, उद्योजक यांना अभिप्राय देण्याचे आवाहन विवेक कोल्हेंनी केले.
कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उडाल्याकडे लक्ष वेधताना, रेशन घोटाळा, गोळीबार प्रकरणात आमदारांचे स्वीय सहायकाचे नाव घेतले गेले. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, टक्केवारीचे आरोप झाले. शहराचे वातावरण दूषित करून जनतेला वेठीस धरण्याचे काम आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा गंभीर आरोप विवेक कोल्हेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.