
Mahayuti Government Loan Decision : महायुती सरकारने राज्यातील नऊ कारखान्यांना तब्बल 1 हजार 104 कोटींच्या कर्ज देण्याचा निर्णय घेतला असून, यात अहिल्यानगरच्या कोपरगावमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे आणि गणेश सहकारी कारखान्याचा समावेश आहे.
या दोन्ही कारखान्यांचे नेतृत्व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे ही मायलेक करतात. लोकसभा निवडणुकीला अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याची भरपाई विधानसभेला दूर झाल्यानंतर ही कर्जकोंडी फुटली असून, या दोन्ही कारखान्यांना महायुती सरकारने जवळपास 188 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
लोकसभा निवडणुकीत साखर पट्ट्यात झालेला पराभव भाजपला (BJP) चांगला जिव्हारी लागला होता. विशेष करून बारातमी आणि अहिल्यानगरमध्ये झालेला पराभव भाजप विसरू शकत नाही. यामुळे या पट्ट्यातील विरोधकांच्या साखर कारखान्यांना मंजूर झालेले कर्ज रोखण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता.
अहिल्यानगरमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) आणि काँग्रेसचे (Congress) भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्याचे कर्ज रोखण्यात आले होते. याचदरम्यान, विधानसभा निवडणुकीचे गणिते आखली गेली होती. कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी देखील आमदारकीची तयारी सुरू केली होती.
नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदार किशोर दराडे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. कोल्हे यांना दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मते मिळाली होती. विवेक कोल्हे यांनी यानंतर कोपरगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती.
शरद पवार यांच्या संपर्कात आल्याने महायुतीची इथं कोंडी झाली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कोपरगावमध्ये लक्ष घालून कोल्हे मायलेकाची समजूत घातली.
भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर कोल्हे मायलेकाची बैठक झाली. यातून कोल्हे यांना चांगलेच राजकीय बळ मिळाले अन् त्यांनी विधानसभेसाठी गेल्या 50 वर्षांची कोल्हे परिवाराची लढण्याची परंपरा मोडीत काढत, थांबण्याचा निर्णय घेतला. पुढे विधानसभेला महायुतीला प्रचंड यश मिळाले अन् कोल्हेंचा थांबवण्याचा निर्णय फायद्याचा ठरला.
कोल्हे यांना हा निर्णय फायदा ठरला. अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर कोल्हेंना विधानपरिषद की राज्यसभेचा शब्द मिळाला, याचे उलगडा पुढच्या राजकीय वाटचालीत स्पष्ट होईल. पण तत्पूर्वी त्यांना राज्यातील महायुती सरकारकडून ते नेतृत्व करत असलेल्या कोपरगावमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे आणि राहातामधील गणेश सहकारी कारखान्यासाठी मोठं कर्ज मंजूर झालं आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. या यशानंतर राज्यातील नऊ साखर कारखान्यांचे रोखलेल्या कर्जांना आता मंजुरी देण्यात आली आहे. यात महायुतीमधील आठ आणि एक काँग्रेसचे दिलीपराव देशमुख यांच्या कारखान्याचा समावेश आहे.
यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकार कारखान्यासाठी तबब्ल 114 कोटी, तर राहाता इथल्या गणेश सहकारी कारखान्यासाठी 74 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. दोन्ही कारखाने मिळून तब्बल 188 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे. गणेश सहकारी कारखान्यावर कोल्हे-थोरात गटाची सत्ता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.